मुंबई | Mumbai
२०२२ या वर्षाचा आज शेवटचा दिवस असून सगळीकडे नववर्षाच्या (New Year) स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. त्यात तरुणाईसह राजकीय नेत्यांचाही समावेश आहे.अशातच या नववर्षाच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे बारामतीत (Baramati) असून त्यांनी याठिकाणी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे…
यावेळी ते म्हणाले की, सत्तेचा गैरवापर होत असल्याचे आम्ही सातत्याने सांगत आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत हे दिसून आले असून ज्या लोकांना आत टाकले, त्यांच्याबद्दल काही आढळले नाही, हे न्यायदेवतेने देखील सांगितले आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करुन लोकप्रतिनिधींना डांबून ठेवण्याचे काम मागचे सहा महिने – वर्षभरात झाले आहे. यामधून सरकारचा दृष्टीकोन चुकीचा असल्याचे कोर्टाच्या माध्यमातून संबंध देशाच्या समोर आले आहे. त्यामुळे सरकारने याच्यातून काहीतरी शिकावे, असे पवारांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, संबंध वर्षाचा आढावा घेतला असता २०२२ हे वर्ष शेतीसाठी (Agriculture) चांगले गेले आहे. देशासमोर एक नवीन चित्र उभे राहत असून ५६ ते ६० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. चांगला पाऊस झाला, क्रय शक्ती वाढली. त्यामुळे शेतकरी यशस्वी होईल व्यापार आणि उद्योग या क्षेत्रात चागले दिवस यायला पाहिजे. भारत हा निर्यातदार देश होऊ शकतो. अर्थव्यवस्थासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. सत्तेवर कुणी असेल तरी अर्थव्यवस्था सुधारावी लागेल. राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून अर्थव्यवस्थवर काम केले पाहिजे, असेही पवार म्हणाले.
तसेच पवारांनी संसदेच्या अधिवेशनावरही (Convention) भाष्य करत नाराजी व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, अधिवेशनात विरोधकांना बोलू द्यायचे नाही अशी केंद्राची भूमिका आहे. सभागृहात गोंधळ करायचा आणि विधेयक मंजूर करून घ्यायची ही सरकारची भूमिका आहे. हे चित्र याआधी कधी झाले नाही. हे किती दिवस चालणार काय माहित, याचा विचार आम्हा विरोधकांना बसून करावा लागेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.