मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात पदाचा मास्क बाजुला ठेवून केलेल्या टीकेला भाजपचे खासदार नारायण राणे यांनीही शेलक्या शब्दात जोरदार प्रत्यूत्तर दिले.
शिवसेनेचा दसरा मेळावा हा फक्त आदित्य ठाकरेंना क्लीन चीट देण्यासाठी होता, जनतेसाठी नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे. अभिनेता सुशांत सिंह याच्या हत्येमागे आदित्य ठाकरेंचा हात आहे, असा थेट आरोप नारायण राणे यांनी केला आहे. सुशांत सिंह याच्या हत्येबाबत आणि दिशा सॅलियनच्या हत्येबाबत सीबीआयचा तपास अजून पूर्ण व्हायचा आहे, त्या आधीच उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाला क्लीन चीट देऊन टाकली, असा आरोपही त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका कराल तर जशास तसे उत्तर देणार असा इशारा नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडी शेण गोमुत्र इत्यादी शब्दांचा वापर शोभत नाही त्याचा निषेध करतो असे राणे म्हणाले.