नंदुरबार | प्रतिनिधी
भारत माता की जय, गो कोरोना गो चा जयघोष करत आज नंदुरबार शहरासह जिल्ह्यात दिव्यांचा लखलखाट करण्यात आला. या दिव्यांच्या लखलखाटात आज नंदनगरी न्हाऊन निघाली. दिव्यांच्या लखलखाटासह फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आल्याने जणु काही आज दिवाळी सण साजरा होत असल्याची जाणीव झाली.
गेल्या चार महिन्यांपासून जगभरात कोरोना या महाभयानक विषाणूजन्य आजाराने थैमान घातले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त “सोशल डिस्टन्स” हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आदेश केंद्र शासनाने दिला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी देशभरातील नागरिकांना आवाहन करून आपण सर्व एकजूट आहोत हे दाखवण्यासाठी रविवारी सर्वांनी रात्री नऊ ते नऊ वाजून नऊ मिनिटापर्यंत घरातील सर्व विजेचे दिवे बंद करून वातीचे दिवे, टॉर्च , मोबाइलची टॉर्च लावून लखलखाट करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभर चांगला प्रतिसाद मिळाला.
नंदुरबार शहरासह जिल्ह्यात आज रात्री नऊ वाजता प्रत्येक घरासमोर नागरिकांनी दिवे लावुन लखलखाट केला. तसेच भारत माता की जय, गो कोरोना गो, असा जय घोष करण्यात आला. तसेच फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. त्यामूळे जणू आज संबंध जिल्हाभर दिवाळी सण असल्याची जाणीव झाली. सर्वत्र दिव्यांच्या लखलखाट झाल्यामुळे दिव्यांच्या प्रकाशाने नंदनगरी प्रकाशमय झाली.