Saturday, April 27, 2024
Homeनगर21 हजार 514 सभासदांना मतदानासाठी पात्र ठरवावे

21 हजार 514 सभासदांना मतदानासाठी पात्र ठरवावे

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे एकूण 22 हजार 711 सभासद आहेत.

- Advertisement -

त्यातील 1 हजार 197 सभासद मयत आहेत. हे मयत सभासद वगळून राहिलेले 21 हजार 514 सभासद अंतिम मतदार यादीत समाविष्ट करावेत, अशी ठाम मागणी प्रारूप यादीवरील गुरुवारी (दि.25) होणार्‍या हरकतीवरील सुनावणीच्यावेळी आपण मांडणार आहोत, असे नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी सांगितले.

नागवडे सहकारी साखर कारखान्याने व्यक्तिगत सभासदांचे आणि सोसायटी सभासदांचे क्रियाशील आणि अक्रियाशील हे केलेले वर्गीकरण चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. पुण्याच्या प्रादेशिक साखर सहसंचालकांनी भवानीनगर साखर कारखान्यामध्ये मयत सभासद वगळून बाकीचे थकबाकीदारांसह सर्व सभासद अंतिम मतदार यादीत घेतले होते.

दि. 24 जानेवारी 2020 रोजी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी वृत्तपत्रात बातमी देऊन भवानीनगरच्या मतदार यादीला दुजोराही दिलेला आहे. त्याप्रमाणेच आता नागवडे सहकारी साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी करण्यात यावी, असेही प्रा. दरेकर म्हणाले.

नागवडे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने दि. 30 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या सभेच्या ठराव नंबर 6 (1) ने पाच वर्षे कालावधीतील ऊस पुरवठ्याची अट शिथिल केलेली आहे. दि. 23 डिसेंबर 2019 च्या संचालक मंडळाच्या ठरावाने शेअर्स पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे.

दि. 26 जानेवारी 2020 च्या ठराव क्रमांक 9 ने थकबाकीदार व मयत सभासद वगळून बाकीचे सर्व अंतिम मतदार करण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे प्रारुप मतदार यादीत पाठविलेल्या 9 हजार 589 पात्र सभासदांची संख्या बदलून ती 11 हजार 925 ने वाढू शकते आणि एकूण पात्र सभासद संख्या 21 हजार 514 पर्यंत होऊ शकते.

दि. 21 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठराव क्रमांक 12 अन्वये संस्था सभासदांची वार्षिक सभेची उपस्थिती क्षमापित केलेली आहे. त्यामुळे 43 पैकी अक्रियाशील ठरविलेल्या 33 सोसायट्यांचे ठराव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता 21 हजार 514 व्यक्तिगत सभासद होऊ शकतील आणि सर्वच्या सर्व म्हणजे 43 सोसायट्या मतदार यादीत येतील.

हीच भूमिका घेऊन कारखान्याने प्रारुप मतदार याद्या प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे पाठविल्या असत्या तर सुमारे 700 हरकती घेण्याचा प्रश्नच उद्भवला नसता आणि कारखान्याला विचारांती संचालक मंडळाचे चार वेगवेगळे ठराव करण्याची वेळही आली नसती. चुकीच्या प्रारूप याद्या सादर करून नागवडे साखर कारखान्याने अंतिम मतदार याद्यांचा चेंडू विनाकारण प्रादेशिक साखर सहसंचालक, अहमदनगर यांच्या कोर्टात टोलविलेला आहे.

प्रारूप याद्यांवरील आमचे आक्षेप आणि कारखान्याने सादर केलेले चार ठराव विचारात घेऊन अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात. अन्यथा आम्हाला औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे, असेही दरेकर म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या