Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरवेळ वाढवून द्या.. नाहीतर मार्केट बंद करू

वेळ वाढवून द्या.. नाहीतर मार्केट बंद करू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनासंदर्भातील नियम व कायद्यांचे ज्ञान आम्हाला नको आहे. मूग व अन्य शेतमालाची आवक वाढत असल्याने मार्केट यार्डची वेळ वाढवून द्या,

- Advertisement -

नाही तर मार्केट कमिटीत शेतमाल खरेदी-विक्रीचे काम व्यापारी थांबवतील, असा स्पष्ट इशारा आडते बाजार मर्चंट्स असोसिएशनने दिला आहे. अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना पत्र दिले आहे.

बाजार समितीत सध्या मुगाची आवक वाढली आहे. आलेल्या मालाची प्रतवारी करणे, तो उतरवून घेऊन संबंधित शेतकर्‍यांच्या नावाने नोंदवणे, त्याचा लिलाव करणे, विक्री झाल्यावर मालाचा वजन-काटा करून वाहनात वा बैलगाडीत माल टाकणे, शेतकर्‍याला मालाचे पैसे देण्यासारखी कामे दुकानदार व्यापारी, खरेदीदार व्यापारी, दिवाणजी, मुनिमजी, हमाल कामगार, बैलगाडीवाले, टेम्पोवाले, ट्रकवाले करीत असतात.

सोशल डिस्टन्स, सॅनिटायझेशन, मास्कचा वापर केला जातो. सकाळी 9 ते 5 या वेळेतच ही कामे करण्याचा कटाक्ष असतो. पण मालाची आवक वाढल्यावर थोडा उशीर होतो. रविवारी असा उशीर झाल्यावर काही शासकीय अधिकार्‍यांनी तेथे येऊन व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली व कायद्याचे भरपूर ज्ञान दिले.

शेतकर्‍यांच्या मालाची वेळेचे बंधन न पाळता विक्री करणार्‍या व्यापार्‍यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली. त्यामुळे सर्वजण स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत असताना शेतमालाची आवक वाढल्यावर बाजार समितीत काम करण्याची वेळ वाढवली पाहिजे.

शेतकर्‍यांच्या कामात व्यस्त असलेल्या व्यापार्‍यांचा गौरव तर सोडाच, पण त्यांना अपराधी व गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जाते. दादागिरी, मारहाण व दंड आकारणी होत असल्याने त्याचा मर्चंट्स असोसिएशन निषेध करीत आहे, असे या पत्रात चोपडा यांनी म्हटले आहे.

शेतमालाचे व्यवहार करण्यास वेळेचे बंधन नसावे, काम पूर्ण करण्याची व उशिरा घरी जाण्याची परवानगी व्यापार्‍यांना मिळावी, नाही तर शेतकरी व व्यापार्‍यांचे नुकसान होऊ नये, म्हणून बाजार समितीत व्यापारी व्यवहार बंद करण्याचा निर्णय मर्चंट्स असोसिएशन घेईल, असा इशाराही चोपडा यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या