राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी शहरातील नगर-मनमाड महामार्गाला जोडून असलेल्या चौथ्या ओढ्यावरील अतिक्रमणे त्वरित हटविण्याची मागणी शहरातील रहिवाशांनी केली आहे.
याबाबत तहसीलदार राहुरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, नगर-मनमाड महामार्गाच्या पश्चिमेस चौथा ओढा जुन्या काळापासून असून जवळपास भागडा डोंगरापासून वाहत येणारा हा ओढा नगर-मनमाड रस्ता, राहुरी कॉलेजजवळ ओलांडून पुढे जातो. या ओढ्याला नेहमीच पावसाळ्यात मोठे पाणी येते. परंतु ठिकठिकाणी या ओढ्याच्या मार्गात अतिक्रमण झाले असून यामुळे अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
काहींच्या विहिरी ओढ्याच्या पाण्याने पडल्या आहेत. या ओढ्याच्या मार्गात अनेक ठिकाणी रहिवासी क्षेत्र झाले असल्याने अतिक्रमणामुळे पाण्याला वाट न मिळाल्याने रहिवाशी क्षेत्रातही पाणी होत आहे. पाण्याची वाट आडल्यामुळे चौथ्या ओढ्याचे पाणी इतरत्र घुसून जवळपास पाण्याच्या टाकीपर्यंत रहिवाशी क्षेत्रात येत आहे. यातून अनेकवेळा दुर्घटनाही घडल्या आहेत. त्याचबरोबर येथील शेती व शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शासनाने या ओढ्यावरील अतिक्रमण त्वरित रिकामे करून येणार्या पावसाळ्यातील नुकसान टाळावे व दुर्घटनाही होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. निवेदनावर येथील शेतकरी दत्तात्रय सांगळे, सारंगधर सांगळे, सोपान सांगळे, भास्कर सांगळे, विनय भुजाडी, पंकज भुजाडी, हिराबाई भुजाडी, सुशिलाताई भुजाडी, भाऊसाहेब शेटे, गजानन सातभाई, प्रदीप भुजाडी, इलियास आतार, हरिभाऊ उंडे, दत्तात्रय कवाणे, पांडुरंग भुजाडी, पंडितराव धुमाळ, राम शिंदे, राजेंद्र गाडेकर, विलास भुजाडी, रमेश भुजाडी, दीपक भुजाडी, आदी शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.