अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेले व वीज चोरी संबंधित न्यायालयात प्रलंबित असलेली अशा महावितरणशी संबंधित नाशिक, मालेगाव आणि नगर मंडळातील एकूण 677 ग्राहकांनी प्रतिसाद देऊन विलासराव देशमुख, अभय योजनेचा लाभ घेऊन तसेच तडजोडीच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये शनिवारी 7 मे रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 60 लाख 2 हजार रुपयांचा भरणा करून प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.
शनिवारी झालेल्या लोक अदालतमध्ये महावितरणकडून कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेले व वीजचोरी संबंधित दाखलपूर्व प्रकरणे आणि न्यायालयात प्रलंबित असलेली हजारो प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यात कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेले ग्राहक यामध्ये नगर मंडळातील 601 ग्राहकांनी 49 लाख 78 हजार तसेच वीजचोरी संबंधित दाव्यांमध्ये नगर मंडळामध्ये 76 दाव्यामध्ये तडजोड करीत ग्राहकांनी 10 लाख 24 हजार रुपयांचा भरणा केला आहे, अशी 677 प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली. यामध्ये 60 लाख 2 हजार रुपयांचा भरणा केला आहे.