संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात सात दशके गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रा. एन. डी. पाटील यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य कायम दिशादर्शक ठरले आहे. शेतकरी व गिरणी कामगारांच्या प्रश्नांबरोबर सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कासाठी ते अखेरपर्यंत लढत होते.
उच्च विद्याविभूषित असलेल्या या व्यक्तिमत्त्वाने महाराष्ट्राच्या विधानसभेत व विधान परिषदेत विविध प्रश्नांवर आवाज उठवला. डॉ. पाटील यांनी साहित्य व शिक्षण क्षेत्रात मोठे काम केले असून रयत शिक्षण संस्थेत विविध राबवलेले उपक्रम हे राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी अनुकरणीय ठरले आहेत. डॉ. पाटील यांच्या निधनाने सामान्यांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लढवय्ये व्यक्तिमत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
तत्त्वनिष्ठ व पुरोगामी विचारांचे पाईक हरपले – आ. डॉ. सुधीर तांबे
प्राचार्य, शिक्षण आयोगाचे सदस्य, माजी मंत्री, विविध कौन्सिलचे सदस्य, असे वेगवेगळे पदांची यशस्वीपणे जबाबदारी पार पाडताना प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी कायम संघर्ष केला. शेतकरी कामगार पक्षातून शेतकरी व गिरणी कामगारांसाठी त्यांनी लढा दिला. उच्च विद्याविभूषित असणारे डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने पुरोगामी विचारांचे तत्त्वनिष्ठ राजकारणी हरपले असल्याची भावना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे.