Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र'मुंबई सेंट्रल टर्मिनस'चे नामांतर होणार

‘मुंबई सेंट्रल टर्मिनस’चे नामांतर होणार

मुंबई । Mumbai

पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामांतरण करण्यात यावे अशी मागणी शिवसेने कडून होत होती. शिवसेनेच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्यात येणार आहे. मुंबई सेंट्र्ल टर्मिनसचे नाव बदलून

- Advertisement -

‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ असे करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. केंद्र सरकारकडून या नामांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना पत्राद्वारे दिली असल्याचं सांगण्यात येतंय. मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या विधीमंडळात मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर पुढील मंजुरीसाठी तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. या प्रक्रियेचे पुढे काय झाले, याची चौकशी करणारे पत्र शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी गृहखात्याकडे केली होती. त्याला उत्तर देताना प्रक्रिया सुरू असून सर्व विभागांचा अहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडेल, असं उत्तर त्यांना पत्राद्वारे देण्यात आलंय.

नाना शंकर शेठ यांना भारतीय रेल्वेचे जनक मानले जाते. त्याचप्रमाणे आधुनिक मुंबईचे शिल्पकार देखील म्हणून ते ओळखले जातात. त्यांचे मूळ नाव जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे असे होते. लोक त्यांना आदराने नाना म्हणत. त्यांचा जन्म 1803 साली तर मृत्यू 1865 साली मुंबईत झाला. ते एक व्यापारी होते. त्याचसोबत शिक्षण तज्ञ, समाजसुधारक देखील होते. भारतात आणि पर्यायाने आशियात रेल्वे सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते इंडियन रेल्वे असोसिएशनचे सदस्य होते. याच संस्थेमुळे इंग्रजांनी मुंबईत रेल्वे सुरू केली. भारतातील पहिल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे म्हणजेच आताच्या मध्य रेल्वेच्या संचालकांपैकी एक होते. पहिल्या बोरी बंदर ते ठाणे धावलेल्या रेल्वेमध्ये त्यांनी गोल्डन पासने प्रवास केला होता. त्यावेळी रेल्वेत प्रवास करायला नागरिक घाबरायचे मात्र नाना यांनी स्वतः प्रवास करून लोकांची भीती दूर केली. तसेच रेल्वे टिकीट घरासाठी त्यांनी आपल्या बंगल्यातील मागील बाजूची जागा देऊन टाकली. मुंबईतील अनेक स्टेशनच्या उभारणीसाठी त्यांनी स्वतःची जमीन दान केली तसेच निधी दिला. त्यांचा वाडा गिरगावात होता. त्यामुळेच पश्चिम रेल्वेवरील सर्वात महत्त्वाच्या स्टेशनचे म्हणजेच मुंबई सेंट्रल चे नाव बदलून नाना शंकरशेठ ठेवण्यात यावे अशी शिवसेनेची मागणी होती. आधुनिक मुंबईच्या उभारणीसाठी नानाचे प्रचंड मोठे योगदान आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या