अकोले |प्रतिनिधी| Akole
कोतूळ पूल उभारणीच्या नावाखाली पिंपळगाव खांड धरणाचे पाणी सोडून मुळा विभाग उद्ध्वस्त करण्याचे
सत्ताधार्यांचे षडयंत्र असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी व्यक्त केला. पाणी न सोडता समुद्रात पूल उभारतात तसे तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला दिला आहे.
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे मार्गदर्शनाखाली मुळा बारमाही केली. पिंपळगाव खांड धरण, केटी बंधारे बांधले आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहे. अजून बरेच केटी बंधार्यांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. मात्र हे साठे महिन्यात रिकामे होतील.
मे व जून मध्ये खरे पाण्याची आवश्यकता भासणार आहे. पावसाळा जर लांबला तर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा आवर्तन करावे लागणार आहे. मात्र कोतूळ पुलाच्या नावाखाली पाणी सोडून देण्यात येणार आहे. आज तंत्रज्ञान विकसित झाले असून समुद्रात पूल उभारले जातात.
शिवाय पिंपळगाव खांड धरणात सुद्धा सात, आठ मीटरपर्यंत मृत साठ्याच्या पाण्याची उंची राहणार आहे. त्यात कसे काम करणार आहे. जसे ते काम होणार आहे तसेच पाणी न सोडता काम करावे. या मुळा विभागातील शेतकर्यांना याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती प्रशासन देत नाही.
मुळा नदीचे व आढळेचे ही असेच पाणी सोडून दिलेतर टँकरमुक्त झालेला तालुका टँकरयुक्त होण्यास वेळ लागणार नाही. पाणी न सोडण्याचा निर्णय झाला नाहीतर अन्यथा आंदोलन उभारावे लागेल. असाही इशारा भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, भाऊसाहेब गोडसे, शेतकरी आघाडीचे जिल्हा सचिव विठ्ठल कानवडे, महिला आघाडीच्या जिल्हा सचिव मंदाताई बराते, तालुका सचिव रेश्मा गोडसे, प्रकाश कोरडे, विक्रांत शेळके, म्हतु लांडे, अमोल गोडसे, चास भाजपा अध्यक्ष गोपीनाथ शेळके आदींनी दिला आहे.