अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
आगामी मोहरम व गणेशोत्सव सणांसह अन्य धार्मिक व राजकीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार 27 जुलै घेण्यात आली. ही बैठक सुरू असताना अचानक वीजपुरवठा बंद पडल्याने उपस्थित अधिकारी व शांतता समिती सदस्यांनी आपापल्या मोबाईलचे टॉर्च सुरू करून त्या उजेडात बैठकीचे कामकाज सुरू ठेवले. दरम्यान, मोहरम मिरवणुकीत कायदा-सुव्यवस्था राखावी व नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्यासह सर्व उपअधीक्षक, सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षक, गोपनीय शाखेचे कर्मचारी व शांतता समिती सदस्य यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक झाली.
मिरवणूक परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवणार, बंदोबस्तासाठी एसआरपी कंपनी आणि होमगार्डची मागणी करण्यात आली आहे, मिरवणुकीत डीजे लावण्यासाठी कोणतीही परवानगी दिली जाणार नाही, झेंडे व फ्लेक्स लावण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार, फ्लेक्सवरून कुठलाही वाद होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे, सोशल मीडियावर अफवा पसरवू नये, अनुचित प्रकार कुठेही दिसला तर पोलिसांशी संपर्क साधावा, अशा विविध सुविधा व सूचनांची माहिती देताना, उत्सव पारंपरिक पद्धतीने व उत्साहाने साजरा होण्यासाठी आपली सर्वांची जबाबदारी आहे.
पोलीस प्रशासन फक्त नागरिकांसाठी आहे व नागरिकांसाठी काम करणार आहे. येणार्या काळामध्ये मोहरम, दहीहंडी व गणपती यासारखे सार्वजनिक धार्मिक सण आहेत. मागच्या सणासुदीच्या दिवसांमध्ये जे घडले, ते अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे यंदा परवानगी न घेता कोणत्याही ठिकाणी झेंडा लावला तर, संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. सार्वजनिक ठिकाणी झेंडा लावण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी. झेंड्याचे पावित्र्य जपण्यासाठी हा विषय हाती घेण्यात आलेला आहे, असेही यावेळी आवर्जून सांगण्यात आले.