धुळे ।Dhule । प्रतिनिधी
चालु खरीप हंगामात (kharif season) खत (Fertilizer) आणि बियाण्यांची टंचाई (seed scarcity) निर्माण होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. खतांचा तुटवडा भासणार नाही, यासाठी सामुहीक प्रयत्नांची गरज आहे. जर शेतकर्यांना (farmers) वेळेवर आणि योग्य मात्रेत खत मिळत नसेल तर गरज पडल्यास पंतप्रधानांकडे (Prime Minister) जाऊ, दिल्लीत बैठक घेऊ. मात्र जिल्ह्यात खतांचा तुटवडा निर्माण होऊ देणार नाहीत. खा. डॉ.सुभाष भामरे ( MP Dr. Subhash Bhamre) यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज दुपारी जिल्ह्यातील खत, बियाणे विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी खा. डॉ.सुभाष भामरे हे बोलत होते. याप्रसंगी जि.प अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जि. प.चे कृषी आणि पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील, गजानन पाटील, माजी कृषी सभापती अरविंद जाधव, रामकृष्ण खलाणे, जि.प सदस्य विरेंद्र गिरासे, आशुतोष पाटील, संजय शर्मा, भाजपा तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील,सीडस पेस्टीसाईजस,फर्टिलायझर डिलर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष मानसिंग गिरासे, कार्यकारी अध्यक्ष साहेबचंद जैन, संजय चौधरी, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रल्हाद पाटील तसेच जिल्ह्यातील खत, बियाणे विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा.भामरे पुढे म्हणाले की, कृषी सभापतींनी शेतकर्यांचा सर्व समावेशक विचार करुन खत,बियाणे विक्रेत्यांची बैठक घेणे हे विशेष आहे. जिल्ह्यात असे पहिल्यादांच झाले आहे.रशिया आणि युक्रेनच्या युध्दामुळे खतांची नियोजन करणे आवश्यक आहे. यापुर्वी केंद्र शासनाने शेतकर्यांना माफक दरात खत मिळावे, या करीता अॅडीशनल सबसिडी देखील दिली. बियाण्यांच्या विक्रीत शेतकर्यांची फसवणुक होणार नाही याची खबरदारी विक्रेत्यांनी घ्यावी. बोगस बियाणे, खतांच्या माध्यमातुन जर फसवणुक होत असेल तर अशा विक्रेत्याला पाठीशी घालु नये, असे आवाहन त्यांनी केले.
विक्रेत्यांनी पीओएस मशीनच्या माध्यमातुनच खतांची विक्री करावी. मिश्र खत, जैविक खतांचा वापर वाढविण्यासाठी शेतकर्यांचे प्रबोधन करावे. शेतकर्यांना सेंद्रीय शेतीबाबत जनजागृती करावी, असे आवाहनही खा.भामरे यांनी केले. शासनाच्या विविध योजना असून त्याबाबत कृषी विभागाकडून पाहिज तसे प्रबोधन होत नाही. त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे, असे आवाहनही शेवटी त्यांनी केले.
दरम्यान बैठकीच्या सुरवातीला कृषी सभापती संग्राम पाटील यांनी प्रत्येक शेतकर्यांना योग्य पध्दतीने खरीप हंगामात खतांचा पुरवठा व्हावा ही सर्वांची जबाबदारी आहे.संकटात असलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी सर्वांनी सामुहीक प्रयत्नांचे आवाहन केले. तर शिरुड येथील गजानन पाटील म्हणाले की, कृषी विभागाकडून खतांच्या वितरणाबाबत नियोजन करण्यात येत नाही. चक्क माती मिश्रीत खतांची विक्री होते. सात वर्षापर्यंत बोगस खत कंपनी कार्यरत राहते, मग कृषी विभागाचे भरारी पथक काय करतात, असा सवाल केला. मागील वर्षी दोंडाईचात खत मिळत होते. मात्र धुळ्यात खताचा पत्ता नव्हता. कृषी विभागाचे अधिकारी धुळफेक करतात. म्हणुन खतांचा काळाबाजार होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच जि.पअध्यक्ष रंधे यांनी म्हणाले की, सर्वच शेतकर्यांना खतांची उपलब्ध व्हावी, या करीता नियोजन करावे. युरीया मिळावा या उद्देशाने वाद होत असतो. या करीता आता बाजारात नॅनो खताची उपलब्धता झाली आहे. या नॅनो खतासह सेंद्रीय खताबाबत प्रबोधन करावे. विक्रेत्यांनी शेतकर्यांमध्ये प्रबोधन देखील करावे, असे आवाहनही त्यांनी केले.