Friday, May 10, 2024
Homeशब्दगंधसरस्वतीमाँ...

सरस्वतीमाँ…

माझी सरस्वती माँ आपल्या सर्वांना सोडून गेली आहे. हृदय अत्यंत शोकाकूल झाले आहे. त्यांच्याविषयी किती आणि कोणकोणत्या आठवणी सांगू? गाण्यातील सिद्धी कशी प्राप्त होते, याचे लतादीदी हे उत्तम उदाहरण होते. नजर रोखलेल्या तिरंदाजाचा तीर सपकन लागावा तसा त्यांचा सूर लागतो. या मंत्रभारल्या दिव्य स्वरांची मोहिनी चिरंतन काळ राहणारी आहे.

स्वतःला ‘भाग्यवंत’ म्हणवून घेण्याचे क्षण अनेकांच्या आयुष्यात फार कमी वेळा येतात. पण आपण सारे एका गोष्टीसाठी आयुष्यभर स्वतःला भाग्यवान म्हटले पाहिजे, ती म्हणजे साक्षात सरस्वतीदेवी असलेल्या लतादीदींचा अमोघ स्वर आपल्याला ऐकण्याची संधी मिळाली. त्यातही मी स्वतःला अत्यंत नशीबवान मानतो की मला त्यांच्यासोबत गाण्याचे भाग्य लाभले. याबद्दल मी परमेश्वराचे शतजन्म आभार मानत राहीन. ज्यांच्याविषयी बोलायचे झाले तर किती बोलू आणि किती नको व्हावे, अशी फार थोडी माणसे आपल्या आजूबाजूला असतात. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने गगनाची उंची गाठली आहे आणि तरीही त्यांचे पाय सामान्यांप्रमाणेच जमिनीवर आहेत अशा माणसांच्या बाबतीत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव आदराने अग्रस्थानी घ्यावे लागेल. साक्षात सरस्वती माँ! त्यांचे आजवरचे कर्तृत्व आणि त्यांच्यातील स्वभावधर्म पाहिल्यानंतर साक्षात सरस्वतीलाच भेटल्याचा आनंद होतो.

लहानपणापासून ज्यांच्या गाण्याच्या स्वरांवर आपले कान तयार झाले, त्यांच्याबरोबरच गाण्याची संधी मिळेल, असे वाटलेही नव्हते. पण परमेश्वर कृपेने आणि दीदींच्या प्रज्ञेने ती संधी दिली आणि माझ्या आयुष्याला, कारकीर्दीला एक वेगळे उजाळ्याचे वैभव प्राप्त झाले.

- Advertisement -

लतादीदी या स्वरसरोवरातील राजहंसी होत्या. परिपूर्णता हे त्यांच्या गाण्याचे दुसरे नाव होते. गाण्यातील सिद्धी कशी प्राप्त होते, याचे लतादीदी हे उत्तम उदाहरण होते. नजर रोखलेल्या तिरंदाजाचा तीर सपकन लागावा तसा त्यांचा सूर लागतो. ही एक प्रकारची दैवी देणगीच. या वरदानाला साथ लाभली ती अफाट रियाजाची आणि अभ्यासाची. त्यामुळेच हा स्वर विश्वव्यापी ठरला. सार्‍या जगातील रसिकांचे निरातिशय प्रेम त्यांच्या स्वरांना लाभले.

संगीतकार जयदेव यांचा सहाय्यक म्हणून काम करत असताना लतादीदींना जवळून पाहण्याचा योग आला. पण त्यावेळची त्यांची भेट म्हणजे एक जुजबी योगच होता. त्यानंतरच्या काळात ‘मेरा रक्षक’ या चित्रपटाचे संगीत संगीतकार रवींद्र जैन करत होते. त्यावेळी मला त्यांच्याशी जवळून ओळख करून घेण्याची संधी मिळाली. मी एक गायक आहे, अशा शब्दात रवींद्र जैन यांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. खरेतर त्यांच्याशी परिचय होताना मी काहीसा हबकलो होतो. पण दीदींनी माझी आपुलकीने सविस्तर चौकशी केली. त्यावेळी मी कोल्हापूरचा असल्याचे कळल्यानंतर त्यांना माझ्याविषयी अधिकच आपुलकी वाटू लागली. त्यांनी माझ्या गाण्यांच्या कॅसेटस् आणायला सांगितल्या. त्यांनी अनेक प्रसिद्ध संगीतकारांना माझ्या गाण्याबद्दल सांगितले. हा खूप चांगला गातो, असे सांगितले. खरे पाहता ही माझ्या कारकीर्दीला मिळालेली सुंदर कलाटणीच होती. त्यामुळे मंगेशकर कुटुंबाचे माझ्या आयुष्यात एक अढळ स्थान आहे. त्याविषयी शब्दांत सांगता येणे खरोखरच अवघड आहे. काही भावना अव्यक्त असतात तसे काहीसे हे आहे.

मी लतादीदींबरोबर पहिले द्वंद्वगीत ‘क्रोधी’ या चित्रपटासाठी गायले. ‘चल चमेली बाग मे’ असेे त्या गाण्याचे बोल होते. त्या गाण्याचे रेकॉर्डिंग त्यांच्याबरोबर होणार आहे या कल्पनेनेच मी खूप घाबरून गेलो होतो. पण लतादीदींनी माझ्याशी सहजपणे बोलून ती दूर केली. त्या म्हणाल्या, ‘तू असाच गा, तसाच गा’ असे तुला आजपर्यंत अनेकांनी सांगितले असेल. पण तू घाबरू नकोस. तू तुला हवे त्या पद्धतीने गा. समोर कितीही मोठा कलाकार असला तरी घाबरायचे नाही. संगीतकाराने आपल्याला जी चाल सांगितली आहे तिला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. इतर कोण काय सांगते यापेक्षा गाणे काय मागते याकडे लक्ष द्यायचे.’ त्यांच्या या बोलण्यामुळे मी निश्चिंत झालो. मनावरचे दडपण सरले आणि हे गाणे छान रेकॉर्डिंग झाले. पुढे जाऊन ते हिटही झाले. या गाण्याच्या निमित्ताने दीदींकडून मिळालेली शिकवण लाखमोलाची ठरली. जणू मला त्यांनी एक मूलमंत्रच दिला. पुढील काळात नंतर मी त्यांच्याबरोबर अनेक गाणी म्हटली.

वेगवेगळ्या भाषेतील गाणी गाणार्‍या लतादीदी म्हणजे गाण्यातील पूर्णबिंदू आहेत. माझ्याकडे असंख्य ध्वनिफिती आहेत. पण त्यातील 98 टक्के तरी ध्वनिफिती या दीदींच्याच आहेत. आयुष्यात सुख-दु:ख, अडीअडचणीचे प्रसंग येत असतात. पण अशा प्रसंगात दीदींच्या गाण्यामुळे मी रिलॅक्स होतो. दीदींकडून नेहमीच काही ना काही चांगले शिकायला मिळाले. त्यांच्या प्रत्येक गाण्यात अचूकतेचा, परिपूर्णतेचा ध्यास होता. आपला सूर कसा लागतो आहे, गाण्यातील शब्द कसे लागत आहेत, उच्चारातील भावना नीट येतात की नाही इत्यादी गोष्टींकडे त्यांचे नेहमीच लक्ष असायचे. गायक म्हणून समृद्ध होण्यासाठी दीदींसारखे विद्यापीठ असणे खूप गरजेचे असते.

माणूस म्हणूनही त्या श्रेष्ठ होत्या. एखादी व्यक्ती भेटल्यानंतर त्याची त्या आस्थेवाईकपणे चौकशी करत. त्यांचा चेहरा वरकरणी गंभीर असला तरी त्यांच्यामध्ये एक अस्सल विनोदबुद्धी होती. त्यांच्या बोलण्यातून अनेकदा त्याची प्रचिती यायची. गाण्याइतकाच त्यांचा स्वभावही मधूर होता. मला आठवतेय, ‘लेकीन’ या चित्रपटाची निर्मिती लतादीदींनी केली होती. त्यासाठी पार्श्वगायन करण्याची संधी मला मिळाली. या चित्रपटात ‘सुरमयी शाम’ हे गीत मी गायले आहे. हे गाणे खूप गाजले. या चित्रपटाला हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले आहे. तालमीनंतर गाणे प्रत्यक्ष रेकॉर्ड करताना समोर लतादीदी बसल्या होत्या. त्यामुळे मला जास्तच टेन्शन आले होते. आपले गाणे कसे होते आणि त्यामुळे दीदींना काय वाटेल, याचे ते टेन्शन होते. त्यांच्या ते लक्षात आले असावे. त्यावेळी त्या मला म्हणाल्या, ‘सुरेश, मला फक्त इतकेच सुचवायचे आहे की, या गाण्यातील ‘साँस’ हा शब्द अशा पद्धतीने उच्चारला पाहिजे की त्यामुळे त्यातून श्वास घेतल्याची जाणीव होईल.’ त्यांच्या या वाक्याने माझ्या मनावरचे टेन्शन कमी झाले आणि त्यांना हवे होते तसे गाणे माझ्या कंठातून उमटले. त्यांच्याबरोबर अनेक गाणी मी गायली. त्यामध्ये ‘मेघा रे मेघा रे’, ‘मेरी किस्मत मे तू नही शायद’, ‘इन हसी वादियो में’, ‘ये आँखे देखकर’, ‘माझे रानी माझे मोगा’, ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’ अशा असंख्य गाण्यांचा उल्लेख करता येईल. हे सर्व माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहेत. मी ते कधीही विसरू शकणार नाही.

दीदींनी आपल्या सहगायकाला नेहमीच सांभाळून घेतले. धाकट्या भावाप्रमाणे त्यांनी माझ्यावर प्रेम केले. मी या क्षेत्रात यशस्वी झालो, त्याचे बरेचसे श्रेय लतादीदींना जाते. परमेश्वर कोणीही पाहिलेला नाही. पण लतादीदी यांच्यासारख्या गानसरस्वतीच्या रूपाने तो मला भेटला, असे मी मानतो. या परमेश्वराचे दर्शन घेऊन माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्याचे सार्थक झाले आहे. लतादीदींसारख्या थोर व्यक्तिमत्त्वामुळे माझ्यावरही सुरेल संस्कार झाले आहेत. आयुष्यभर पुरतील, असे हे संस्कार आहेत.

जवळपास 15 ते 18 वर्षे दरवर्षी लतादीदी यांनी मला पद्मश्री पुरस्कार मिळावा याकरता राष्ट्रपतींना पत्र लिहिली होती. अखेर त्यांची ही प्रखर इच्छा पूर्ण झाली. अशी ही सरस्वती माँ आपल्याला सोडून गेली आहे. याचे दुःख किती आणि काय सांगावे?

- Advertisment -

ताज्या बातम्या