RBI कडून रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही

दिल्ली | Delhi

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीला २ डिसेंबर पासून सुरु होती. या बैठकीत चर्चा करण्यात आलेल्या मुद्द्यांवर आज निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे.

पुढील काही महिने अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाचे असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितलं आहे. तसंच पुढील तिमाहित जीडीपी वाढीचा दर सकारात्मक राहण्याची शक्यताही यावेळी वर्तवण्यात आली. दरम्यान, यावेळीही रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.

“रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. रेपो दर हे ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. बैठकीत सर्व सदस्यांच्या संमतीनं हा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती दास यांनी यावेळी दिली. तर दुसरीकडे रिव्हर्स रेपो दरही ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. बँक रेटमध्येदेखील कोणतेही बदल करण्याचा निर्णय झाला नाही. ते ४.२५ टक्क्यांवर आणि कॅश रिझर्व्ह रेशो तीन टक्क्यांवर कायम असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, पुढील काळात महागाई दर नियंत्रणात येईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली.

“अर्थव्यवस्थेत पुरेशी रोख रक्कम उपलब्ध असेल याची आम्ही खात्री देतो. तसंच गरज भारल्यास आवश्यक ती पावलंही उचलली जातील. पुढील तिमाहीतील जीडीपी वाढीचा अंदाज वाढवून ०.१० टक्के करण्यात आला आहे. तर त्याच वेळी, चौथ्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान देशातील जीडीपी वाढ ०.७० टक्के राहिल असा अंदाज आहे,” असं दास म्हणाले. तसंच संपूर्ण वर्षासाठी जीडीपी वाढीचा दर उणे ७.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

२०१९-२० या कालावधीसाठी कमर्शिअल बँक लाभांश देणार नाही. तिसऱ्या तिमाहीत ग्राहक निर्देशांकावर आधारित महागाई ६.८ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.८ टक्के राहण्याची अपेक्षा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले. आरटीजीएस सेवा पुढील काही दिवसांमध्ये ग्राहकांसाठी २४ तास आठवड्याच्या सर्व दिवसांसाठी सुरू राहिल. कोणतीही मोठी रक्कम देताना बँक सुरू होण्याची किंवा बँक बंद होण्याची वेळ पाहावी लागणार नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.