Wednesday, April 24, 2024
Homeनगरकरोनापेक्षा आर्थिक संकट मोठे - पाचपुते

करोनापेक्षा आर्थिक संकट मोठे – पाचपुते

श्रीगोंदा|तालुका प्रतिनिधी|Shrirampur

करोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता शहरातील व्यापारी पेठ बंद ठेवण्यापेक्षा संबंधित रुग्णाचे घर अथवा परिसर सील करण्याचा निर्णय घेण्यात यावा, असे मत युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांनी श्रीगोंदा शहरात वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेऊन बैठक घेतली असता व्यक्त केले.

- Advertisement -

आ. बबनराव पाचपुते यांच्या सूचनेनुसार युवा नेते विक्रमसिंह पाचपुते, उपनगराध्यक्ष अशोकराव खेंडके, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, व्यापारी असो.चे सुरेश भंडारी, राजू नय्यर, अनिल बगाडे, अशोक बगाडे, अमित बगाडे, विक्रम काळे, विशाल बगाडे, सुरेश शहा, अमोल दंडनाईक, सूर्यवंशी टेलर, नवनीत कटारिया, आनंद कटारिया आदी व्यापारी वर्गाच्या उपस्थितीत श्रीगोंदा येथे आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी चर्चेदरम्यान युवा नेते विक्रमसिंह पाचपुते म्हणाले प्रशासनाने केलेल्या चांगल्या कार्यामुळे श्रीगोंदा शहरातील करोना ची संख्या आटोक्यात येण्यास खूप मोठी मदत झालेली आहे.

करोनाबाबत प्रशासनाकडून अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले जात आहे. मात्र तरीही श्रीगोंदा शहरासह तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शहरात वाढती रुग्णसंख्या पाहता शहरातील व्यापारीपेठ बंद ठेवणे उचित ठरणार नाही. त्यामुळे ज्या भागात रुग्ण आढळून येतील तो भाग तेथील नागरिकांशी चर्चा करून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा.

मात्र समाजाला वेठीस धरण्याचे काम प्रशासनाकडून होऊ नये त्यामुळे संबंधित रुग्णाचे घरच सील करण्यात यावे कारण करोनाच्या संकटापेक्षा येणारे आर्थिक संकट खूप मोठे असणार आहे, त्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जाण्यासाठी व्यापारी बाजारपेठ चालू ठेवून प्रत्येकाने सामाजिक अंतर व स्वतः ची सुरक्षितता बाळगली तर नक्कीच आपण करोनाला हद्दपार करू, असा विश्वास पाचपुते यांनी व्यक्त करून प्रशासन करत असलेल्या कार्याचेही कौतुक केले.

आमदार पाचपुतेंचे प्रशासनाला पत्र

शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत प्रशासन योग्य पावले उचलत आहे, पण व्यापारी पेठ बंद ठेवणे हा उपाय नाही.त्यामुळे व्यापारी पेठ चालू ठेवून ज्या भागात रुग्ण सापडेल तो भाग अथवा रुग्णाचे घर सील करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे पत्र आ. पाचपुते यांनी तहसीलदारांना दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या