अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
काही शिक्षकांना मोठा पगार तर काहींना तुटपुंजा पगार अशी शिक्षकांमधील विषमता दूर करण्यासाठी शिक्षक भारती पाठपुरावा करीत आहे. विनाअनुदानीत हा शब्द कायमचा रद्द करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी यांना नियमीत पगार सुरू झाला पाहिजे, यासाठी शिक्षक भारतीने लढा पुकारला आहे. लवकरच तो पूर्णत्वास नेऊ, असे आश्वासन शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक व शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दिले.
विधान परिषद सदस्यत्वाची 15 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आमदार पाटील यांचा तसेच आदर्श शिक्षक पुरस्काप्राप्त शिक्षकांचा सत्कार राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे उपाध्यक्ष दिनेश खोसे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा अध्यक्ष मुकेश गडदे, जिल्हा सरचिटणीस सुनील मते, महिला अध्यक्षा उषा येणारे व संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी शिक्षक भारती सभासद यांच्या सहकार्यातून करण्यात आला. अध्यक्षस्थानी राष्ट्रसेवा दलाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोकाटे होते.
नगर जिल्हा शिक्षक बँकेची निवडणूक शिक्षक भारतीच्या पदाधिकार्यांनी लढवावी. परंतु त्यासाठी स्वतंत्र मंडळ तयार करावे, असेही आ. पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, राज्य सरचिटणीस भरत शेलार, उपाध्यक्ष किशोर कदम, विनोद कडव आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात 312 बालभवन केंद्र
नगर जिल्हा हा राष्ट्रसेवा दल व सत्यशोधक चळवळींचा बालेकिल्ला होता. त्यामुळे जिल्ह्यातील बालकांवर देशभक्तीचे संस्कार रूजवावेत, यासाठी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे यांच्या कल्पनेतून 312 साने गुरूजी बालभवन केंद्र सुरु करण्यात आली आहेत.