अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरात वाहन चोरी, सोनसाखळी चोरी, व्यापार्यांकडील रोख रक्कम चोरी आदींचे प्रमाण वाढले आहे.
विशेषत: मार्केट यार्ड परिसरातील व्यापार्यांवर पाळत ठेवुन त्यांच्याकडील रोख रक्कम चोरण्याचे प्रमाण वाढले असून याबाबत प्रभावी उपाययोजना करुन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप व व्यापारी शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन चोरीच्या घटनांबाबत सविस्तर कैफीयत मांडली. कोठी रोड परिसरात व्यापारी राहुल भंडारी यांच्याकडील साडेसात लाखांची रोकड दोन अज्ञात इसमांनी पळवली.
तर महात्मा फुले चौकात रीतेश पारख युवकाच्या हातातील मोबाईल दोन युवकांनी हिसकावून पोबारा केला. अशा घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांना आळा बसण्यासाठी व चोरट्यांना जरब बसण्यासाठी बीट मार्शलची गस्त वाढवावी अशी मागणी शिष्टमंडळाने यावेळी केली.
यावेळी अविनाश घुले, संजय चोपडा, विपुल शेटीया, किरण पितळे, डॉ. सचिन भंडारी, अॅड. राजेंद्र बलदोटा, अभय गुजराथी, राजेश भंडारी, प्रशांत मुथा, परितोष मुथा, ईश्वर पोखरणा, राहुल भंडारी, सचिन भंडारी, प्रविण कोठारी, महावीर शेटीया, सचिन सुराणा, प्रमोद डागा, संजय गुगळे, भूषण भंडारी, रितेश पारख, ईश्वर काठेड उपस्थित होते.
Leave a Reply