मुंबई | Mumbai
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला GST आयुक्तांची नोटीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. बच्चू कडू यांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
बच्चू कडू म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्या त्यामुळे कारवाई सुरू झाली असेल असं मला वाटते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर, पंकजा मुंडे यांच्या नाराजीची अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्या वेगळा मार्ग निवडणार असल्याचे तर्क-वितर्कही काढण्यात आले होते. अशात, बच्चू कडू यांच्या विधानाने आता राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.
काय आहे प्रकरण?
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला GST आयुक्तांची नोटीस आली आहे. मात्र, या अगोदरच युनियन बँकेने मालमत्ता सील केली. याआधीही केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजी नगर येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी कराबाबत नोटीसा दिल्या होत्या. या नोटिसींना उत्तर न दिल्याने सहा महिन्यांपूर्वी काही अधिकार्यांनी या कारखान्याला अचानक भेट देऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतले होते. त्यामध्ये या कारखान्याने बेकायदेशीररित्या 19 कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाल्याने कारखान्याला यासंदर्भात पुन्हा नोटीस बजावली आहे.