नवी दिल्ली –
महिलांची छेडछाड करणार्यांचे चौकाचौकात पोस्टर्स लावण्यात येणार आहेत तसे आदेश
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना दिले आहेत. यापुढे राज्यामध्ये कोणालाही महिलांची छेड काढण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली तर शहरामध्ये त्या आरोपीचे पोस्टर लावण्यात येणार आहेत. महिलांची छेड काढणार्यांचे फोटो लावण्याच्या पोलिसांच्या या मोहिमेला मिशन दुराचारी असं नाव देण्यात आलं आहे.
या सर्व मोहिमेची जबाबदारी पोलीस खात्याकडे देण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत महिला पोलीस अधिकारी शहरांमधील प्रमुख ठिकाणी गस्त घालतील आणि महिलांची छेड काढणार्यांवर नजर ठेवतील. राज्यामध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर योगींनी हा निर्णय घेतला आहे.
रस्त्यावर मुलींची छेड काढणार्यांविरोधात कठोर कारवाई करावी असा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकार्यांना दिला आहे. कारवाई करण्याबरोबरच या व्यक्तींचे फोटो शहरातील चौकांमध्ये लावण्यात यावेत असंही योगींनी संबंधित अधिकार्यांना सांगितलं आहे.
छेडछाड करणार्यांविरोधात कारवाई करण्यासाठी महिला पोलिसांनाच नियुक्त करावेे, महिलांविरोधातील कोणत्याही गुन्ह्यामधील आरोपींना महिला पोलिसांच्या हस्तेच दंड आणि शिक्षा करावी,
आरोपींना मदत करणार्यांनाची नावंही सर्वांसमोर उघड करण्यात यावीत, ज्याप्रमाणे अॅण्टी रोमियो स्कॉडच्या माध्यमातून महिलांची छेड काढणार्यांना धडा शिकवण्यात यश आलं त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस स्थानकाने या नवीन मोहिमेत सहभागी होऊन महिलांविरोधातील गुन्हे कामी होतील यासाठी प्रयत्न करावेत असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान योगी सरकारने यापद्धतीचा निर्णय सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान केला होता. सरकारी संपत्तीचे नुकसान करणार्यांचे फोटो योगी सरकारने चौका चौकांमध्ये लावले होते.
आरोपींना मदत करणार्यांवरही होणार कारवाई
कोणत्याही पोलीस स्थानकाच्या हद्दीत महिलांविरोधात एखादा गुन्हा घडला तर तेथील बीट इनचार्ज, पोलीस स्थानकातील प्रमुख अधिकारी आणि सर्कल ऑफिसर जबाबदार असतील, महिला आणि मुलींविरोधात होणार्या छेडछाड, बलात्कार, लैंगिक शोषणासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपींना मदत करणार्यांची नावंही समोर आणली गेली पाहिजेत असं केल्यास एखाद्या गुन्ह्यामध्ये मदत करणार्यांच्या मनातही बदनामीसंदर्भातील भिती निर्माण होईल असं योगींनी म्हटलं आहे.