जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
भुसावळ तालुक्यातील ग्रामपंचायतीत लाखोंचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी संबंधीत दोषींवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय दलित पँथरतर्फे गुरुवारी जि.प.समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, या गैर व्यवहाराबाबत 15 दिवसांत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांनी दिले आहे. दैनिक ‘देशदूत’ने वृत्त मालिका लावून ग्रा.पं.तील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणले.
खंडाळा ग्रामपंचायतमध्ये 2015 ते 2020 या कालावधीत रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, 14 वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजनांमध्ये ग्रा.पं.तील सरपंच, उपसरपंच, आणि ग्रामसेवक यांनी लाखोंचा गैरव्यवहार केल्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार गटविकास अधिकारी यांनी चौकशी केली असून, कारवाईसाठी टाळाटाळ करीत आहे.
त्यामुळे संबंधीतांवर कारवाई व्हावी या अनुषंगाने राष्ट्रीय दलित पँथरतर्फे सिध्दार्थ सोनवणे, प्रेमचंद सुरवाडे, रवी सोनवणे, सुभाष जोहरे, शरद सुरवाडे, विलास बोरीकर यांनी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करत जि.प. प्रशासनाचे लक्ष वेधले.
तसेच निवेदन देखील देण्यात आले आहे. त्यानुसार 15 दिवसांत चौकशी करुन नियमानुसार दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन बाळासाहेब बोटे यांनी दिले आहे.