दूध संस्थांवर कारवाई करण्याची राहुरीत शेतकरी संघटनेची मागणी

jalgaon-digital
1 Min Read

माहेगाव |वार्ताहर| Mahegav

करोनाच्या महामारीने देशात धुमाकूळ घातल्याने व्यापार्‍यांसह शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असताना दुधाला प्रतिलिटर 18 रुपये भाव देऊन शेतकर्‍यांची लुबाडणूक करणार्‍या दूध संस्थांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेकडून राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले, महाराष्ट्र शासनाने सन 2018 ला दुधाला 25 रुपये भाव देण्याचे जाहीर केले. परंतु त्या अगोदर शेतकर्‍यांचे एकवर्ष 20 रुपये प्रतिलिटरने दूध खरेदी करण्यात आले. त्या एक वर्षाच्या दुधाचा फरक सरकारने दिला पाहिजे. दूध संकलन करणारे व्यापारी शहरी भागात दुधाचा एकही रुपया कमी करीत नाही.

मग हा तोटा शेतकर्‍यांनाच का दिला जातो? तसेच वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा, जिल्हा सहकारी बँकेकडून शेतकर्‍यांना वेळेवर पीक कर्जपुरवठा केला जात नाही. शेतकर्‍यांची अडवणूक केली जाते. यामुळे शेतकर्‍यांना खासगी सावकाराकडे जावे लागते. याचा खरीप हंगामावर मोठा परिणाम होणार आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या सूचनेप्रमाणे व कायद्याप्रमाणे शेतकर्‍यांना जास्तीत जास्त कर्ज द्यावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर तालुकाध्यक्ष नारायण टेकाळे, अमोल मोढे, विनायक बोठे, दत्तात्रय टेकाळे, काशिनाथ जाधव, आप्पासाहेब जाधव, भाऊसाहेब जाधव, आप्पासाहेब टेकाळे, अशोक टेकाळे, राजू टेकाळे, ज्ञानदेव कदम, दादासाहेब टेकाळे आदींसह शेतकर्‍यांची नावे आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *