जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
नेरीनाका स्मशानभूमी ही करोनाबाधित रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मेहरुण स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गर्दी होवू लागली आहे.
परंतु याठिकाणी अंत्यसंस्कारासाठी असलेले ओट्यांसह लोखंडी पिंजर्यांची दुरावस्था झाली असल्याने ही स्मशानभूमी शेवटची घटका मोजत असल्याचे स्थिती याठिकाणी निर्माण झाली आहे.
शहरात अंत्यसंस्कार करण्यासाठी चार स्मशानभूमी आहेत. यातील नेरीनाका स्मशानभूमी ही कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
त्यामुळे अंत्यसंस्काराासाठी नागरिकांना मेहरुण, शिवाजीनगरयासह पिंप्राळा येथील स्मशानभूमीत जावून अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने याठिकाणी अंत्यंस्कारासाठी नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
याबाबत संबंधितांकडून वारंवार सोयी-सुविधांबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या. परंतु प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
…तर मग आसारीचे कुंपन तयार करुन करावे लागतो अंत्यसंस्कार
मेहरुणच्या स्मशानभूमीत संपुर्ण आजूबाजूच्या परिसरातील नागरिक अंत्यसंस्कारासाठी येत आहे. याठिकाणी अंत्यसंस्कारासाठी केवळ तीन ओटे आहेत.
कोरोनाकाळापासून या ठिकाणी दिवसाला अंत्यसंस्कारासाठी किमान दहा प्रेत येतात. एकाचवेळी तीनपेक्षा अधिक अंत्ययात्रा आल्या.
तर ओट्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत लोखंडी आसाराचे कुंपन तयार केले जाते. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात असल्याचे त्याठिकाणी दिसून आले.