बेलापूर |वार्ताहर| Belapur
येथील भूमिपुत्र राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज तथा पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास यांची मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर समितीचे विश्वस्त म्हणून काल दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने नियुक्ती करण्यात आली.या निवडीने गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला त्याबद्दल ग्रामस्थांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आहे.
अयोध्येत उभारल्या जाणार्या भव्यदिव्य श्रीराम मंदिर निर्माण समितीचे खजिनदार म्हणून केंद्र सरकारने सोपवलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळीत असताना आता मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर समितीचे विश्वस्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पं.मदनमोहन मालवीय महाराज यांच्या प्रेरणेतून तसेच संस्थापक संत श्री. हनुमानप्रसाद पोद्दार (कल्याण) यांच्या विशेष सहकार्याने सन 1951 मध्ये मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
स्वामींच्या निवडीची बातमी समजताच पं. महेश व्यास यांच्या अधिपत्याखाली पेठेतील जुन्या बालाजी मंदिरापुढे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पं. महेश व्यास यांनी निवडी संबंधी माहिती दिली.त्यानंतर फटाके वाजवून तसेच मंदिरात आरती करण्यात आली.
यावेळी सर्वश्री पं. श्रीकांत व्यास, जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुवालाल लुंकड, रमेशचंद्र दायमा, नंदलाल डागा, माजी सरपंच भरत साळुंके, उपसरपंच अभिषेक खंडागळे,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा,सुरेश जोशी, रणजित श्रीगोड, रविंद्र कोळपकर,बेलापूर शिक्षण संस्थेचे सहसचिव दीपक सिकची,शेखर डावरे, दिलीप दायमा,योगेश खरात,रामप्रसाद व्यास,ओमप्रकाश व्यास,सुनिल व्यास आदी उपस्थित होते.