आरडगाव |वार्ताहर| Aradgav
राहुरी तालुक्यातील मानोरी शिवारातील खुडसरगाव शिव ते मानोरी वाघवस्ती दरम्यान सुरू असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारून भौगोलिक परिस्थितीनुसार सांडपाण्यासाठी रस्त्याच्या दोन्हीही बाजूला साईडपट्ट्या करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. यात कोणताही दुजाभाव करू नये, अशी मागणी कामात सुधारणा झाली नाही तर शेतकर्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
या रस्त्याचा आर्थिक आराखडा सुमारे 1 कोटीहून अधिक रकमेचा आहे. यात रस्ता रूंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण, साईड गटारी, साईडपट्ट्या, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी पाईप, आदींचा समावेश आहे. मात्र, लगतच्या शेतकर्यांची मागणी धुडकावून संबंधित ठेकेदाराने मनमानीपणे काम सुरू केले आहे. रस्त्यालगत पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईप टाकणे आवश्यक असतानाही संबंधित ठेकेदार शेतकर्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. शेतकर्यांच्या मागणीनुसारच काम करावे, अशी मागणी तंटामुक्तीचे अध्यक्ष बाजीराव आढाव, बाबुराव मकासरे, संजय देवकाते, बाळासाहेब ढेरे, दत्तात्रय आढाव, सुनील पोटे, अशोक आढाव, जिजा विटनोर, साहेबराव कारंडे, आदींसह शेतकरी उपस्थित होते.