Wednesday, April 24, 2024
Homeनगर... अन्यथा ठेकेदारांवर कारवाई करा

… अन्यथा ठेकेदारांवर कारवाई करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अमृत भुयारी गटार योजनेचे काम शहरामध्ये संतगतीने सुरू आहे. खोदकामामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

- Advertisement -

ठेकेदाराने ते खड्डे बुजविले नसल्याने नागरिकांना रहदारी करत असताना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अमृत भुयारी गटार योजनेचा ठेकेदाराने रस्त्यांची चाळण करुन टाकली आहे. सर्वत्र मातीचे ढीग साचल्याने ठेकेदाराने खडडे बुजवून ते दुरुस्त करणे आवश्यक आहे. कामाची मुदत संपूणही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. तरी लवकरता लवकर हे काम मार्गी लावावे, अन्यथा ठेकेदारावर कारवाई करावी. असे आदेश सभापती मनोज कोतकर यांनी दिले.

स्थायी समितीच्या सभेत सभापती कोतकर यांनी विविध विषयांवर चर्चा करत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक सदस्य डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, शाम नळकांडे, विजय पठारे, सोनाबाई शिंदे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

स्मार्ट एलईडी पथदिव्यांसाठीची निविदा अनेक महिन्यांपासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे. मी स्वतः: उपोषण केले. अद्यापही हा विषय मार्गी न लागल्याने नाराजी व्यक्त केली. अभियंता राजेंद्र मेहेत्रे यांनी याबाबत माहिती देताना मनपाकडे प्राप्त झालेली निविदा ठेकेदाराला अनुभव नसल्याने रद्द केल्याचे सांगत नवीन निविदा मागविण्यात आल्याचे सांगितले.

जन्म-मृत्यूचे दाखल्यासाठी नागरिकांना दोन-दोन महिने वाट पहावी लागत आहे. तसेच अनेकवेळा हेलपाटे मारावे लागत आहे. तरीही दाखले वेळेवर दिले जात नाही. वेळेवर दाखले देता येत नसेल तर खासगीकरण करुन द्यावे व नागरिकांना घरपोच दाखले देण्याची सुविधा करावी.

नगर शहराच्या सुशोभिकरणात भर पडावी, यासाठी महापालिकेने उपाययोजना कराव्या. तसेच खासगी कंपन्यांकडून सुशोभिकरणासाठी मदत घ्यावी. जेणेकरुन शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यास मदत होईल. अधिकारी सभेत पाहतो, करतो असे म्हणत, नंतर पुढे काहीच होत नाही. मंजूर कामाच्या फाईली अनेक दिवस पडून राहतात. यावेळी सदस्यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या डीपीआरमध्ये मंजूर असलेली जेसीबी खरेदी रखडल्याकडे लक्ष वेधले.

मनपा भाडेतत्त्वार जेसीबी घेत असते, त्यावर मोठा खर्च होत असून जेसीबी खरेदीसाठी मंजुरी असताना ती खरेदी का केली जात नाही. आम्ही आमच्या घरची कामे सांगत नसून आपल्या शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांनी आपल्याला निवडून दिलेले आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे सभापती मनोज कोतकर यावेळी म्हणाले.

यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, सभापती मनोज कोतकर यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा महापालिकेत उमटवला आहे. तरुण वयात काम करण्याची इच्छा त्यांनी नगरकरांना कामातून दाखवून दिली. नेहमीच स्वतः कामासाठी आग्रही भूमिका मांडताना दिसत असत, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या