Thursday, May 2, 2024
Homeनगरमाणिकडोह 90 टक्के, कर्जतकरांची चिंता मिटली

माणिकडोह 90 टक्के, कर्जतकरांची चिंता मिटली

कर्जत (प्रतिनिधी)

तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी उपयुक्त असणार्‍या कुकडी प्रकल्पा अंतर्गत येणारे माणिकडोह धरण हे गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच 90 टक्क्यांहून अधिक भरल्याने त्याचा फायदा हा कर्जत तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील शेतकर्‍यांना होणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, कुकडी प्रकल्पांतर्गत 5 धरणे येतात, त्यापैकी माणिकडोह धरणाचा एकूण साठा हा 10.88 टीएमसी एवढा असून त्यापैकी 10.18 टीएमसी पाणी साठा हा उपयुक्त आहे. गेल्या 40 वर्षांत हे धरण फक्त 3 वेळा भरलं आहे आणि यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाचा पाणी साठा हा सध्या 90 टक्क्यांच्याही पुढे गेला आहे.

यंदाच्या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आ. रोहित पवार यांनी प्रयत्न करून आणि वेळोवेळी आवश्यक तो पाठपुरावा करून खरीप हंगामात शेतकर्‍यांच्या मागणीनुसार व सोयीसाठी 8 टीएमसी पाणी येडगाव धरणातून कुकडी डाव्या कालव्यात सुरू केले होते. त्याचा फायदा हा शेतकर्‍यांना झाला त्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने कधीही न भरणारी माणिकडोह आणि पिंपळगाव जोगे ही धरणे तुडूंब भरली आहेत.

दरवर्षी पेक्षा 3-4 टीएमसी पाणी यंदा धरणांमध्ये अधिक आहे. दरवर्षी माणिकडोह धरण हे साधारणतः 60 टक्क्यांच्या दरम्यान भरते. मागच्या 2 वर्षातही तिच परिस्थिती होती. तरीसुद्धा योग्य नियोजनातून आहे, त्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त शेतकर्‍यांचा फायदा कसा होईल, यासाठी प्रयत्न केला गेला. परंतु यंदा मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने कोणतीही अडचण येणार नाही. माणिकडोह धरणाचा 90 टक्के साठा हा कुकडी डाव्या कालव्यासाठी असतो आणि यंदा 90 टक्के धरण भरल्याने त्याचा थेट फायदा हा कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांसह परिसरातील शेतकर्‍यांना होणार आहे. दरवर्षी पेक्षा अधिक आवर्तन मिळणार आहे.

महाविकास आघाडी सरकार असताना डिंभे ते माणिकडोह बोगद्याला मान्यता दिल्याने लवकरच त्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन ते काम चालू होईल, असा विश्‍वास वाटतो. या माध्यमातून कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

– आ. रोहित पवार, कर्जत-जामखेड.

- Advertisment -

ताज्या बातम्या