Friday, April 26, 2024
Homeनगरपारनेर तालुक्यातील मांडओहळ धरण ओव्हर फ्लो

पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरण ओव्हर फ्लो

पारनेर |प्रतिनिधी| Parner

तीव्र पाणी टंचाईच्या (Water scarcity) काळात तालुक्यातील जनतेसाठी जीवनदायीनी ठरणारा मांडओहळ मध्यम प्रकल्प (Mandohal Project) आज पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागला. सलग तिसर्‍या वर्षी मांडओहोळ धरण (Mandohal Dam) भरल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकर्‍यांसह तालुकावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

मांडओहळ प्रकल्पाची (Mandohal Project) एकूण साठवण क्षमता 399 दशलक्ष घनफूट तर उपयुक्त साठा 310 दशलक्ष घनफूट आहे. पळसपूर, नांदुरपठार, सावरगाव परिसरासह मांडओहळ प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात समाधानकारक पाऊस (Rain) झाल्यामुळे धरणात आज अखेर 399 पैकी 380 दशलक्ष घनफूट पाणीसाठा (Water Storage) उपलब्ध झाला आहे.गेल्या वर्षी 20 ऑगस्ट रोजी धरण पुर्ण क्षमतेने भरले होते. यावर्षी मात्र पावसात सातत्य नसल्याने गेल्या वर्षिच्या तुलनेत मांडओहळ दीड महिना उशिराने भरले.

पाणी टंचाईच्या (Water scarcity) काळात दरवर्षी साधारण एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मांडओहळ धरणातील (Mandohal Dam) पाण्यावर अवलंबून रहावे लागते. या काळात तालुक्यातील बहुतांशी गावांच्या पाणी योजनांचे उदभव कोरडे पडतात. त्यामुळे मांडओहोळ धरणातून तालुक्यातील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणी टंचाईच्या काळात मांडओहोळ धरण (Mandohal Dam) तालुकावासियांसाठी जीवनदायीनी ठरते.

तालुक्यातील ढवळपुरी (Dhavalpuri) परिसरातील काळू प्रकल्प 15 दिवसांपूर्वी पुर्ण क्षमतेने भरला आहे तर समाधान कारक पावसामुळे इतर मध्यम प्रकल्प ही भरण्याच्या मार्गावर आहेत .तीन वर्षांपूर्वी (सन 2018) पाणलोट परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने धरणात नवीन पाण्याची आवक झाली नव्हती. एप्रिल 2019 मध्ये धरणातील सर्व पाणी संपल्याने धरण कोरडे पडले होते.त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी धरणातील साचलेला गाळ वाहून नेला. त्यामुळे धरणाची खोली वाढण्याबरोबरच साठवण क्षमतेतही वाढ झाली आहे.

पर्यटकांनी काळजी घ्यावी

धरण परिसराबरोबरच जवळच असलेला रुईचोंढा धबधबा नगरसह पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी पर्वणी ठरतो, मात्र गेल्या वर्षी रुईचोंढा धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पाच पर्यटकांचा विविध घटनांमध्ये धबधब्या खाली असलेल्या डोहातबुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन नागरीकांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या