अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर तालुक्यातील नगर-सोलापूर महामार्ग, आरणगाव-वाळकी-देऊळगाव रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे.
रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असून काही भागात रस्ता पूर्ण खचला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नगर तालुका महाविकास आघाडीने केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ, माजी सभापती रामदास भोर, सभापती प्रविण कोकाटे, शिवसेनेचे राजेंद्र भगत, उपसभापती रवींद्र भापकर, वाल्मिक नागवडे, विजय जाधव, जनार्दन माने, महेंद्र शेळके, दत्तू गवळी, प्रशांत कांबळे, संदीप गुंड, मधुकर म्हस्के आदी उपस्थित होते.
हराळ म्हणाले, तालुक्यातून जाणारा सोलापूर महामार्ग, अरणगाव-वाळकी-देऊळगाव रस्ता, केडगाव-घोसपुरी रस्ता, जामखेड रोडवरील सांडवा-मांडवा-उक्कडगाव रस्ता अतिशय दयनीय झालेले आहेत. खराब रस्त्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या रस्त्यांच्या डागडुजीबाबत तातडीने पावले उचलावीत.
अधीक्षक अभियंता पवार यांनी आठ दिवसांत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानुसार कामाला सुरुवात न झाल्यास ग्रामस्थांसह अरणगाव चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.