नाशिक | Nashik
शहरभर वाढत्या करोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीला कपालेश्वर तसेच रामकुंड परिसरात गर्दी होण्याची शक्यता असल्याने या परिसरात बुधवारी (दि.११) रात्री १ पासून ते शुक्रवार (दि.१२) च्या रात्री १२ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
तसेच या परिसरातील सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांना मनाई करणारा आदेश सहायक आयुक्त प्रदिप जाधव यांनी जारी केला आहे.
शहरात कपालेश्वर मंदिर तसेच नदी किनारील व इतर शिवमंदिरांमध्ये महाशिवरात्री मोठ्या उत्सहात साजरी केली जाते. दरवर्षी मध्यरात्री पासूनच शिवाभिषेक तसेच धार्मिक विधी, पुजांसाठी शिवमंदिरांमध्ये गर्दी होत असते.
या निमित्त रामकुंड परिसरात विविध खेळण्याची तसेच खाद्यपदार्थांची दुकाने येत असल्याने या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. सध्या शहरात करोना साथीचा पुन्हा फैलाव सुरू झाला आहे.
परिणामी पोलीस आयुक्तांनी पुन्हा संचारबंदी आदेश जारी केले असून सायंकाळी ७ ते सकाळ ७ पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशातच महाशिवरात्री होत असल्याने व रामकुंड परिसर, शिवमंदिरांमध्ये होत असलेली गर्दी पाहता पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपालेश्व मंदिरापासून अर्धा किलोमीटर परिघाच्या क्षेत्राता मनाई आदेश लागू करण्यात आले आहे.
यामध्ये केेवळ कपालेश्वर मंदिरात धार्मिक विधीसाठी ५ व्यक्तींच्या उपस्थितीस मान्यता देण्यात आली आहे.
हे वगळता, पुजा साहित्याची दुकाने, यात्रा, जत्रा, या परिसरातील इतर दुकाने, सांस्कृतीक तसेच धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, आठवडे बाजार व सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणारांवर कडक कारवाई होणार आहे.