Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रसाडेचार हजार एसटी वाहक-चालकांची वाचली नोकरी

साडेचार हजार एसटी वाहक-चालकांची वाचली नोकरी

मुंबई | Mumbai –

राज्य परिवहन महामंडळात 2019 मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या कर्मचार्‍यांच्या सेवेस देण्यात आलेली

- Advertisement -

तात्पुरती स्थगिती उठवली आहे. त्यामुळे साडेचार हजार चालक व वाहकांना दिलासा मिळाला आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा मोठा फटका परिवहन सेवांना बसला. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे एसटीचा प्रवासी सेवा हा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत बंद झाला. टाळेबंदी लांबत चालल्याने एसटी महामंडळाने जुलै महिन्यात साडेचार हजार कर्मचार्‍यांच्या तात्पुरत्या सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला होता.

एसटीची सेवा पूर्वपदावर येण्यासाठी अजून बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत वाहतुकीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी असल्याचे नमूद करत सरळसेवा भरतीतील कर्मचार्‍यांच्या नोकर्‍यांवर कुर्‍हाड चालवण्यात आली होती. 2019 मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत चालक व वाहक पदामध्ये रोजंदार गटात नियुक्ती देण्यात आलेल्या कर्मचार्‍यांच्या सेवा तात्पुरत्या खंडित करण्यात आल्या होत्या. गुरुवारी एका आदेशाद्वारे हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. संबंधित कर्मचार्‍यांची खंडित करण्यात आलेली सेवा पूर्ववत् करण्यात यावी व गरजेनुसार नियमित वेतनश्रेणीवरील चालक व वाहकांचाच वापर करण्यात यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे अनुकंपा तत्त्वावरील प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणास देण्यात आलेली स्थगितीही उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पत्रानुसार पुढील कार्यवाही करून त्याचा अहवाल सप्टेंबरपर्यंत महाव्यवस्थापकांना सादर करण्यात यावा, असेही नमूद करण्यात आले आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी हा आदेश जारी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या