Friday, April 26, 2024
Homeराजकीयग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी

ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी

मुंबई –

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे. करोना काळात ग्रामपंचायत निवडणुका घेता आल्या नाहीत त्यामुळे

- Advertisement -

या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा मुद्दा गाजला होता. त्यावर विरोधकांनी न्यायालयात धाव घेतली होती.

या निवडणुका आता घेता येतील का याबाबत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल मागवला आहे. 21 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एप्रिल ते जून 2020 कालावधीत मुदत संपणार्‍या आणि नव्याने स्थापित होणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पत्र दिले आहे.

पत्रात म्हटले आहे, राज्यातील 19 जिल्ह्यातील एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच नव्याने स्थापित 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक हा दि. 17 मार्च 2020 असा होता. राज्यात करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन दि.17 मार्च 2020 रोजी ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर पुढील आदेश होईपर्यंत निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात येत असल्याचे आयोगाच्या पत्रान्वये आदेशित करण्यात आले होते.

लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणण्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्देश जारी करण्यात आलेले आहेत . या अनुषंगाने राज्यातील सद्यस्थितीचा अंदाज घेऊन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या विचारार्थ आहे. तरी आपल्या जिल्ह्यातील दि. 31 मार्च 2020 रोजीचे मतदान तहकूब केलेल्या ग्रामपंचायतींपैकी कोणत्या ग्रामपंचायत हद्दीतील करोना परिस्थिती आटोक्यात आहे, जेथे मतदान घेणे शक्य आहे याबाबतचा विस्तृत अहवाल दि. 21 सप्टेंबर 2020 पर्यंत आयोगास सादर करावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या