अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पशूसंवर्धन विभागाकडून लसीकरणासह अन्य खबरदारीचे उपाययोजना करून देखील जिल्ह्यातील गोवर्गीय प्राण्यामध्ये लम्पीचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढतांना दिसत आहे. शनिवारी एकाच दिवसात जिल्ह्यात नव्याने लम्पी पीडित जनावरांची संख्या 278 ने वाढली असून मृतांचा आकड्यात 18 ची भर पडत एकूण मृतांचा आकडा आता 82 झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून जनावरांमध्ये लम्पीचा संसर्ग वाढत आहे. पशूसंवर्धन विभागाने जनावरांचे बाजार, वाहतूक यावर बंदी आणली आहे. पशूसंवर्धन विभाग थेट मैदानात उतरून आजारी जनावरांवर उपचार आणि लसीरकण अशा दुहेरी भूमिका बजावत असतांना लम्पी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. यामुळे पशूसंवर्धन विभागासमोरील अडचणी वाढतांना दिसत आहे. जिल्ह्यात लम्पीचा संसर्ग झालेल्या जनावरांची संख्या आता 2 हजार 219 झाली असून यात उपचार घेवून बरी झालेल्या जनावरांची संख्या 748 आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 180 गावात लम्पीबाधीत जनावरे असून या गावांच्या पाच किलो मीटरच्या परिघातील 942 गावातील जनावरांना आता लम्पीचा धोका आहे. यामुळे प्राधान्याने या गावातील गायी आणि म्हशींचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण करणे आवश्यक असणार्या जनावरांची संख्या आता 10 लाख 51 हजारांच्या पुढे गेली असून पशूसंवर्धन विभागाने आतापर्यंत 6 लाख 87 हजार 750 जनावरांचे लसीकरण पूर्ण केलेले आहे. तर जिल्ह्यातील जामखेड, कोपरगाव, शेवगाव आणि नगर तालुक्यात एकही जनावर लम्पीमुळे दगावलेले नाही.
तालुकानिहाय मृत्यू
अकोले 11, राहुरी, श्रीरामपूर प्रत्येकी 6, संगमनेर 11, नेवासा 4, कर्जत 27, राहाता 3, पारनेर 7, श्रीगोंदा 4, पाथर्डी 3 अशी आहेत.