नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :
तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची व प्रस्तावित वीज विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे ‘दिल्ली चलो, डेरा डालो, घेरा डालो’ आंदोलन करण्यात येत आहे.
लोक संघर्ष मोर्चाचे साथी किसान समन्वय समितीबरोबर आज दि.24 नोव्हेंबर रोजी वाहन यात्रेने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
लोक संघर्ष मोर्चाचे साथी महाराष्ट्र व मध्यप्रदेश च्या जन संघटनानी काढलेल्या वाहन यात्रेद्वारे दिल्लीकडे निघाले आहेत.
या संघर्ष यात्रेत आज मध्यप्रदेशमधील ठिक्री गावाजवळील सेंच्युरी कंपनीत सुरू असलेल्या संघर्षाला भेट देवून कामगार शेतकरी एकजूट दाखवली.
ही यात्रा इंदोर येथे पोहचल्यानंतर येथे गांधी पुतळ्याजवळ यात्रेचे स्वागत केले गेले. तेथून ही यात्रा देवास येथे पोहचली.
रात्री केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्या मतदार संघात सभा होणार आहे. तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची व प्रस्तावित वीज विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
उद्या दि.25 रोजी ही यात्रा ग्वाल्हेर, आग्रा करत पलवलला मुक्कामी राहणार असून दि. 26 नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलनात सहभागी होणार आहे.
या मोर्चाचे नेतृत्व प्रतिभा शिंदे, ताराचंद पाडवी, प्रकाश बारेला, कलीदर सिकंदर तडवी, अरुण पाटील करत आहेत.