अहमदनगर (प्रतिनिधी)
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशु धन असून कोविडमुळे दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून जनावरांचे आठवडे बाजार बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली असून पुणे जिल्ह्यातील जनावरांचे आठवडे सुरू करण्यास तेथील जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील जनावरांचे आठवडे बाजार सुरू करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात लोणी, घोडेगाव, वाळकी यासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आठवडे बाजार भरतो. आता दिवाळी सण तोंडावर आला असून शेतकऱ्यांना त्यांच्या पशूधनाच्या खरेदी विक्रीतून फायदा होण्याची वेळ असलेली असतानाही जिल्हा प्रशासनाने जनावरांचे आठवडे बाजार सुरू केलेले नाही.
राज्यासह नगर जिल्ह्यात कोविड आणि पशूधनाला होणारे आजार नियंत्रणात आहेत. तसेच अन्य बाबींप्रमाणे शेतकरी आणि पशूधनाचा बाजार भरविणारे करोना नियमांचे पालन करून बाजार भरविण्यास तयार असल्याचे सभापती गडाख यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर जिल्हाधिकारी यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन सभापती गडाख यांना दिले.