अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरा लगत असलेल्या निमगाव वाघा (ता. नगर) येथे बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाशी संपर्क साधून देखील उपाययोजना केल्या जात नसल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने वनक्षेत्रपाल यांना सरपंच रुपाली जाधव व ग्रामपंचायत सदस्य नाना डोंगरे यांनी निवेदन देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
गावातील जावली व भगत मळा परिसरातील शेती मध्ये गेल्या आठ दिवसांपासून बिबट्या आढळून येत आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाला संपर्क करून देखील एकही अधिकारी गावात येत नसल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने वन विभागात जाऊन निवेदन देण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापुर्वी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील उपाययोजना करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे.