‘लव जिहाद’ विरोधी कायदा गरजेचा – खा. विखे पाटील

jalgaon-digital
2 Min Read

उंबरे |वार्ताहर| Umbare

हिंदू माता भगिनीं वरील होत असलेले अत्याचार लक्षात घेता लव जिहाद विरोधी कायदा आणणे ही काळाची गरज असून अशा जन आक्रोश मोर्चातून याचीच मागणी होत असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

राहुरी येथे सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, संसदेचे सध्या अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात लव जिहादच्या कायद्या विषयी आपण निवेदन करणार असून अलिकडच्या काळात अशा घटना दुर्दैवाने वाढत आहेत.

कोणतेही सरकार अशा घटना घडाव्यात यासाठी काम करत नसते. मात्र सरकार अशा समस्या समूळ नष्ट करण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून त्यावर उपाय काढते. नगर जिल्ह्यात अलिकडच्या काळात अशा प्रकारच्या दोन-तीन घटना घडल्या असून पोलीस प्रशासनास वेळोवेळी कडक शब्दात सूचना आपण केल्या असल्याचे खा.विखे म्हणाले. जिल्ह्यातील माता-भगिनींच्या पाठीशी हा भाऊ सदैव असून त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, आणि हाच विश्वास देण्यासाठी या मोर्चात आपण सहभागी झालो आहोत असे त्यांनी सांगितले.

या आठवड्यात अविश्वास ठरावावर चर्चा होणार असून यात लव जिहाद कायदा करण्यासंदर्भात आपण नक्की निवेदन करू असे त्यांनी सांगून, जनआक्रोश मोर्चातून नागरिक आपली भूमिका मांडत आहेत ही चांगली गोष्ट असली तरी कुठल्या एका समाजाला आपण टार्गेट करत नाही, हे लक्षात घेऊन शासनही हा कायदा आणण्यापूर्वी याचा संपूर्ण अभ्यास नक्की करेल असे सांगितले. कायद्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व बाजू पडताळून मग सरकार हा कायदा नक्की लागू करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *