अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा नियोजन समितीत सर्वाधिक सदस्य हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. या विद्यामान जिल्हा परिषद सदस्यांच्या कार्यकाळ संपत आला असून यामुळे सोमवारी (दि.8) होणार्या जिल्हा नियोजन समितीची या सदस्यांची अखेरची बैठक ठरणार आहे. करोना कमी झाल्यानंतर सोमवारी होणार्या बैठकीकडे जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकारी यांच्या नजरा राहणार असून पालकमंत्री आपल्या पदरात किती निधी टाकणार याकडे सदस्यांचे लक्ष राहणार आहे.
जिल्ह्यात चालू महिन्यांत विधान परिषद आणि त्यानंतर जानेवारीत जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. यामुळे सोमवारची जिल्हा नियोजन समितीच्या विद्यमान सदस्यांची अखेरची बैठक ठरणार आहे. बैठकीत पालकमंत्री किती आणि कसा निधी उपलब्ध करून देणार याकडे जिल्हा परिषद सदस्यांचे लक्ष राहणार आहे. गेली दोन वर्षे जिल्हा नियोजन समितीतून सर्वाधिक निधी हा कोविड उपाययोजनांसाठी खर्च करण्यात येत आहे. यामुळे जिल्हा परिषद सदस्यांच्या वाट्याला निधीच मिळाला नव्हता. गेल्या काही महिन्यांपासून करोनाचा प्रकोप कमी झाल्याने नियोजनमधून जिल्हा परिषदेला काही प्रमाणात निधी मिळालेला आहे.
आता जिल्ह्यातून करोना हद्दपारीच्या मार्गावर असल्याने नियोजन समिती शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषदेला किती निधी देणार याकडे सदस्यांचे लक्ष राहणार आहे. जानेवारीच्या पहिल्या अथवा फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने आणि त्याआधी विधान परिषदेची आचारसंहिता असल्याने जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांकडे कालावधी कमी राहिलेला आहे.
पालकमंत्र्यांची अखेरची सभा ?
जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरचे पालकमंत्री पद सोडण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. पक्ष श्रेष्ठींनी यावर अद्याप निर्णय घेतलेला नसला तरी दिवाळीनंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त होत आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या इच्छेनूसार त्यांच्याकडील पालकमंत्रीपद काढल्यास त्यांची देखील सभा शेवटीची ठरण्याची शक्यता आहे.