श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
खंडकरी शेतकर्यांना जमिनीचे वाटप करताना वर्ग 1 धारणेच्या देवू, अशा मार्गदर्शक सूचना असताना प्रत्यक्षात सदर जमिनी वर्ग 2 धारणेच्या देण्यात आल्या. यामुळे शासनाने मार्गदर्शक तत्वाची पायमल्ली करुन खंडकरी शेतकर्यांची दिशाभूल केली असून सदरच्या वर्ग 2 धारणेच्या जमिनी वर्ग 1 धारणेच्या करुन द्याव्यात, अशी मागणी खंडकरी जमिन वाटप समितीचे सदस्य सुधाकर खंडागळे यांनी केली आहे.
यासंदर्भातील प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात श्री. खंडागळे यांनी म्हटले आहे की, खंडकरी शेतकर्यांना जमिनी परत करताना शासनाने मार्गदर्शक तत्वे ठरविली होती. त्यानुसार सदर जमिनी पाटपाण्याच्या हक्कासह वर्ग 1 धारणेच्या मालकी हक्काने देण्याचे ठरले होते. मात्र सन 1978 आणि सन 2012-14 मध्ये खंडकरी शेतकर्यांना वर्ग 2 धारणेनुसार जमिनी देण्यात आल्या. वास्तविक शासनाने शेती महामंडाळासाठी खंडाने जमिनी घेताना वर्ग 1 धारणेच्या घेतल्या. तथापि, परत करताना मात्र वर्ग 2 धारणेच्या करुन दिल्या. ही खंडकरी शेतकर्यांची दिशाभूल असल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्हा बँकेने कर्ज वितरणाबाबत नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. त्यात शेती महामंडळाकडून मिळालेल्या जमिनीसाठी कर्ज वितरण करताना वर्ग 1 धारण करणार्या शेतकर्यांनाच कर्ज द्यावे, असे या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. जमिन धारण करणारे जवळपास 80 टक्के सभासद हे वर्ग 2 च्या जमिनी धारण करणारे आहेत. यामुळे त्यांना कर्ज मिळणे दुरापास्त होणार आहे. याचा विचार करता जिल्हा बँकेने सदरची अट रद्द करावी. तसेच शासनाने खंडकरी शेतकर्यांना वाटप केलेल्या जमिनी वर्ग 1 धारणेच्या करुन द्याव्यात, अशी मागणी श्री. खंडागळे यांनी केली आहे.