Saturday, April 27, 2024
Homeनगरकोपरगाव तालुक्यासाठी मंजूर निधी तुटपुंजा - परजणे

कोपरगाव तालुक्यासाठी मंजूर निधी तुटपुंजा – परजणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

मागील जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झालेले असताना कोपरगाव तालुक्यासाठी केवळ 50 लाख 42 हजारांचा निधी उपलब्ध झाला. हा निधी तुटपुंजा असून दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍यांची घोर निराशा करणारा आहे. पीक नुकसानीच्या वस्तुनिष्ठ परिस्थितीची फेर पडताळणी करून शासनाने निधी वाढवून द्यावा ,अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी केली.

- Advertisement -

राजेश परजणे यांनी यासंदर्भात कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन निधी उपलब्ध झाला असल्याचे शासकीय यंत्रणा सांगते परंतु प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या हातात अद्याप काहीच पडले नाही. त्यातच रविवारी कोपरगाव तालुक्याला परतीच्या पावसाने पुन्हा झोडपल्याने शेतकर्‍यांच्या हातातून होते नव्हते ते सर्व गेले आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून शासनाने पुन्हा पंचनामे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई देणेच योग्य ठरेल. जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी व पुराने तालुक्यात मोठा फटका बसला आहे. उभ्या पिकांसह जमिनी पाण्याखाली गेल्याने शिवारे जलमय झाली होती.

काढणीला आलेल्या सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, तूर, उडीद, मूग, भूईमूग पिकांना मोठा फटका बसला होता. अनेक शेतातल्या केळी, डाळिंब, पपई, चिकू, पेरुच्या बागांचे नुकसान झाले होते. भाजीपाला पिके अक्षरश: सडून गेल्याने शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. मागील वर्षी अनेक शेतकर्‍यांनी पीक विमा उतरवलेला असताना बर्‍याच शेतकर्‍यांना अद्याप विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. मागील वर्षीच्या नुकसान झालेल्या पिकांचीही भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यातच रविवारी कोपरगाव तालुक्यात सर्वदूर परतीचा पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन, वेचणीला आलेला कापूस, चारा पिके पुन्हा जमीनदोस्त झाली आहेत. राज्य शासनाने नुकसान भरपाईपोटी राज्यातील शेतकर्‍यांसाठी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलेले आहे. त्यातून अहमदनगर जिल्ह्यासाठी 10 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

या निधीमधून तालुक्याच्या वाट्याला फक्त 50 लाख 42 हजारांचा निधी उपलब्ध झाला. तालुक्यातील शेती नुकसानीचा विचार करता हा निधी अतिशय तुटपुंजा आहे. यातून शेतकर्‍यांच्या हातात काहीच पडणार नाही. तशातच कोपरगाव तालुक्यातील 999 शेतकर्‍यांच्या 358 हेक्टर क्षेत्राचाच नुकसानीमध्ये समावेश असल्याने अनेक शेतकरी यातून वंचित राहणार आहेत. दिवाळीचा सण पंधरा दिवसांवर आल्याने शेतकर्‍यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्त सर्वच शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याची नितांत गरज आहे. अन्यथा शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे पुन्हा पंचनामे करण्यात वेळ घालविण्याऐवजी सरसकट नुकसान भरपाई जाहीर करून शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी लाभ मिळवून द्यावा, अशी मागणीही श्री. परजणे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या