श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तालुक्यातील कोळगाव शिवारातील साकेवाडी परिसरातील
नऊ ते दहा शेतकर्यांचा मिळून जवळपास चौदा ते पंधरा एकर ऊस जळून खाक झाला आहे.
यापूर्वीही अनेक ठिकाणी वीजमंडळाच्या गलथान कारभारामुळे शॉर्टसर्किट होऊन तालुक्यात अनेक ठिकाणी ऊस पेटून शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वारंवार ऊस जळिताच्या घटना घडूनही वीज मंडळाकडून ऐन गळीत हंगामात ऊस जळाल्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन तोंडचा घास पळवला जात आहे.
गुरुवारी (दि. 12) रात्रीच्या सुमारास विजेच्या तारा एकमेकांना चिकटल्याने शॉर्टसर्किट झाले व आगीचे लोळ उसाच्या उभ्या पिकांवर पडल्याने आग लागली त्यात शेजारीलही ऊस जळून खाक झाला. घटनास्थळी माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांनी भेट देऊन प्रशासनाला याबाबत माहिती दिली. प्रशासनाने या शेतकर्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.
संपूर्ण तालुक्यात 50-60 वर्षांपासून काही वीज वाहक तारा आहेत. अत्यंत जिर्ण झाल्याने नेहमी त्या तुटणे, झोळ तयार होणे नेहमीचेच झाले आहे. या जुन्या तारा तुटल्यामुळे असंख्य शेतकर्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शेतमालाची अतोनात हानी झाली आहे. रात्रीच्या वेळेस शेताला पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकर्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागते. शेतकरी नेहमी तक्रारी करून देखील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी झोपेचे सोंग घेऊन कारभार करत आहे.