पंचाळे । वार्ताहर | Panchale
तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये दोन दिवसापूर्वी मुसळधार पाऊस (heavy rain) झाल्याने शेतकर्यांची (farmers) खरीपरची लगबग सुरु झाली आहे. दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटात वेगवान वार्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
मृग नक्षत्राच्या शेवटी अद्रा नक्षत्राच्या सुरुवातीस पावसाने दमदार हजेरी लावल्याने देवपूर, पांगरी, वावी सोमठाणे, दहिवाडी, उजनी, सांगवी, पिंपळगाव, श्रीरामपूर, मेंढी या गावांमधील नदी, नाले, ओढे यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा (Water storage) झाला आहे. अचानक पाऊस आल्याने अनेक ठिकाणी शेतकर्यांचे बांध फुटून माती वाहून गेली तर काही ठिकाणी शेतातील बांध, झाडे जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले.
पावसामुळे पंचाळे गावाला वरदान ठरणारा गावालगतचा बंधारा भरला आहे. यामुळे शेतकर्यांच्या विहिरींमध्ये पाण्याचा साठा वाढण्याची शक्यता आहे. या पावसामुळे जनावरांच्या चार्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. सध्या जमिनीत दोन ते तीन फूट ओलावा निर्माण झाला असून बांधामध्ये पाण्याची पातळी असल्याने पेरणीसाठी जमीनीत वापसा होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या शेतकरी खते, बी-बियाणे खरेदीच्या तयारीला लागले असून मका, सोयाबीन, बाजरी या पिकांच्या पेरणीच्या तयारीत आहेत.