जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed
खर्डा किल्ल्यावर विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना विजयादशमीच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याबाबत राज्यभरात उत्सुकता वाढीस लागली आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी या सोहळ्याच्या स्थळाला भेट देऊन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी केली.
त्यावेळी त्यांनी खर्ड्याच्या किल्ल्यासमोर दसर्याच्या दिवशी झळकणार्या भगव्या स्वराज्य ध्वजाच्या स्तंभाची पाहणी करून कार्यक्रमासाठी लोकसहभागातून सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. तसंच यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत नियोजनाबाबत चर्चा केली.
महाराष्ट्राच्या शौर्यशाली परंपरेतून जन्मलेल्या, एकतेची-बंधुत्वाची हाक देणार्या व 74 मीटर अशा विक्रमी उंचीने सर्वांच्या मनात भरलेल्या भगव्या स्वराज्य ध्वजाने थोड्याच दिवसांत अथक यात्रेकरवी जनमानसात आणि देशभरातही महाराष्ट्राच्या करारी इतिहासाची ओळख पोहोचवण्यात मोठे योगदान दिले आहे. 37 दिवसांचा अहोरात्र प्रवास करत, 96 शक्तीपीठे आणि प्रेरणास्थळांना वंदन करत, महाराष्ट्रातील 36 जिल्हे व इतर पाच राज्यांना भेट देऊन पुन्हा राज्यात पोहोचलेला हा भगवा स्वराज्य ध्वज आता कायमच उंच झळकून आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्यधर्माची आठवण करून देत राहाणार असल्याचे आ.पवार म्हणाले.