अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कोव्हिड सेंटरमधून खासगी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यासाठी कार्डियाक अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने पुण्यातील वृत्तवाहिने
आणि मुळचे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील असणारे पत्रकार पांडुरंग रायकर (वय 42) यांचे बुधवार पहाटे निधन झाले.
दरम्यान, पत्रकार रायकर यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे आदेश दिले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रायकर यांच्या मृत्यूला सरकारी यंत्रणेला दोषी धरले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील सामान्य कुटुंबातील पांडुरंग यांनी हलाखीच्या परिस्थितीतही शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतानाच लॉ चे शिक्षणही पूर्ण केले. विविध दैनिकांत काम केल्यानंतर रायकर यांनी नगर जिल्ह्यात आणि त्यानंतर 2018 मध्ये पुण्यातील एका वृत्तवाहिनीत रूजू झाले.
20 ऑगस्टला त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडे उपचार घेतले. करोना टेस्टही करण्यात आली, मात्र ती निगेटिव्ह निघाली. त्यानंतर ते कोपरगाव याठिकाणी नातेवाईकांकडे आले होते.
त्याठिकाणी पुन्हा 28 ऑगस्टला त्यांना त्रास सुरू झाला. यामुळे त्यांना शिर्डीच्या एका रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुण्याला हलविण्यात आले. पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावत जात होती.
पुण्यातील पत्रकार व नातेवाईकांनी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. शिफ्टींगसाठी रात्रभर कार्डियाक अॅम्ब्युलन्स मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. एक अॅम्ब्युलन्स मिळाली पण त्यात ऑक्सिजन नव्हता.
दुसरी मिळाली तर त्यात डॉक्टर नव्हते. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून पहाटेच्या सुमारास अॅम्ब्युलन्स येत असल्याचा निरोप मिळाला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा बळी घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रायकर यांच्यामागे पत्नी, आई, वडील, एक मुलगा एक मुलगी व तीन बहिणी असा मोठा परीवार आहे.