Friday, April 26, 2024
Homeनगरजेऊरच्या यात्रोत्सवात दंगल, 9 आरोपींना अटक

जेऊरच्या यात्रोत्सवात दंगल, 9 आरोपींना अटक

अहमदनगर |तालुका प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रा उत्सवादरम्यान रविवारी रात्री झालेल्या दंगलप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गावात घडलेल्या दंगलीने गावामध्ये तणावपूर्ण वातावरण असून भितीपोटी सोमवारी सर्वच व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवल्याने गावांमध्ये शुकशुकाट दिसून आला. पोलिसांच्यावतीने शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

बायजामाता यात्रा उत्सवाच्या शेवटच्या दिवशी हिंदू-मुस्लिम गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत खेळणी दुकानदार महिला व काही ग्रामस्थ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे यात्रेकरूंची मोठी धांदल उडाली. महिला, बालके, वृद्ध सैरावैरा धावत होते. दगडफेकीचा सर्वात जास्त फटका खेळणी दुकानदारांना बसला. त्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच महिला मोठ्या प्रमाणात जखमी झाल्या असून खेळणी दुकानदारांची आपल्या गावी परतण्यासाठी मोठी धडपड सुरू पहावयास मिळाली.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नाईक दीपक गांगर्डे यांनी फिर्याद दिली आहे. इद्रीस मुनीर शेख, मन्नू अलीम कुरेशी, अजिज रफीक शेख, हर्षद बागवान, साहिल बागवान, मुनीर खैरू शेख, शेख मुस्ताक, युनुस शेख, मुसा शेख, फइस रफिक शेख, अतुल उर्फ सोमनाथ सुखदेव तवले, सुनील दारकुंडे, गणेश दारकुंडे, दीपक शिंदे यांच्यासह इतर 100 ते 150 लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. रहाटगाडग्याजवळ पाळण्यामध्ये बसण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला.

मुस्लिम मोहल्लयातील मुस्लिम मुलांनी दगडे उचलून इतर मुलांच्या पाठीमागे पळाले. यावेळी फिर्यादी व साक्षीदार यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तेथून पलायन केले व त्यानंतर दोन्ही बाजूने दगडफेक सुरू झाली. त्यावेळी फिर्यादी यांनाही दगड मारून धक्काबुक्की करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जेऊर गावात घडलेल्या प्रकारानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. सद्यस्थितीत गावात तणावपूर्ण वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जेऊर गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

जेऊर गावातील सर्व नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तणाव निर्माण होईल असे संदेश प्रसारित करू नये. अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही. सर्वांनी शांतता राखावी.

– राजेंद्र सानप, एमआयडीसी पोलीस स्टेशन.

अतिक्रमण ठरतोय कळीचा मुद्दा

बायजामाता टेकडी परीसरात हनुमान चौथरा येथे करण्यात आलेल्या अतिक्रमणावरून जेऊर गावात दोन महिन्यांपासून अंतर्गत धुसफूस सुरू होती. संबंधित अतिक्रमण हा कळीचा मुद्दा ठरत असून रविवारी घडलेल्या प्रकाराला त्या अतिक्रमणाचीच किनार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या