Thursday, April 25, 2024
Homeनगर‘जलयुक्त शिवार 2’ मध्ये नेवासा तालुक्यातील 12 गावे होणार पाणीदार!

‘जलयुक्त शिवार 2’ मध्ये नेवासा तालुक्यातील 12 गावे होणार पाणीदार!

नेवासा | Newasa

राज्य सरकारने पुन्हा सुरू केलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियान 2’ अंतर्गत नेवासा तालुक्यातील 12 गावांची निवड करण्यात आली असल्याने ही 12 गावे पाणीदार होणार आहेत.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सन 2014 ते 2019 या काळात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेवर आक्षेप घेत ती बंद करण्यात आली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच ‘जलयुक्त 2’ ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली. ‘जलयुक्त 2’ मध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तालुका पातळीवरील प्रांताधिकारी समितीने शिफारस केलेल्यांपैकी 12 गावांची निवड केली आहे.

यात जास्त उपसा झालेली, टँकरग्रस्त, अटल भूजल प्रकल्प कृषी सिंचन योजनेतील गावांच्या निवडीस प्राधान्य देण्यात आले आहे.

पूर्वीच्या योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारणाची कामे केली जात होती. ‘जलयुक्त 2’ मध्ये आता माथा ते पायथा या पद्धतीने पाणलोटनिहाय कामे केली जाणार आहेत. पूर्वीच्या जलयुक्त 1 मध्ये निवड झालेली परंतु कामे अपूर्ण असलेली गावे निवडण्यात आली आहेत. अपूर्ण व प्रगतिपथावरील प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे.

त्यानुसार अपूर्ण व प्रगतीतील कामे प्राधान्याने, त्यानंतर क्षमता पुनर्स्थापित करणे (दुरूस्ती व नूतनीकरण), क्षेत्र उपचार कामे, नाला उपचार कामे, लोकसहभाग किंवा सार्वजनिक खासगी भागीदारीतील कामे केली जाणार आहेत. जलसंधारण विभाग,कृषी विभाग, पाटबंधारे विभाग व वन विभाग मिळून ही कामे करणार आहेत.

कृषी विभागामार्फत शेत बांधबंदिस्ती, सलग समतलचार, दगडाचे बांध, गॅबियन बंधारे, मातीचे नालाबांध, सिमेंट काँक्रिट नालाबांध, शेततळे, नाला खोलीकरण व गाळ काढणे, विहीर पुनर्भरण अशी कामे करण्यात येणार आहेत.

वन विभागामार्फत सिमेंट बंधारे, मातीनालाबांध, दगडी बांध, गॅबियन बंधारे, सलग समतल चर अशी कामे करण्यात येणार आहेत. सामाजिक वनीकरण विभागामार्फत शेतकर्‍यांच्या शेतजमिनीवर वृक्ष लागवड करणे, कन्या वन समृद्धी योजना, अटल बांबू समृद्धी योजनेंतर्गत बांबू शेती लागवड, अटल आनंदवन घनवन योजना, वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना योजना राबवण्यात येणार आहे.

भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेमार्फत पुनर्भरण चर, पुनर्भरण चर आणि विंधन विहीर, भूमिगत बंधारे, गॅबियन बंधारे, अटल भूजल योजना, जलजीवन मिशन स्रोत बळकटीकरण करणे अशी कामे करण्यात येणार आहेत. मृद व जलसंधारण विभागामार्फत सिमेंट नालाबांध, कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे आणि पाझर तलाव दुरुस्ती कामे करण्यात येणार आहेत.

नेवासा तालुक्यातील फत्तेपूर, लोहरवाडी, झापवाडी, चांदा, घोडेगाव, सोनई, करजगाव, सुकळी खुर्द, पिचडगाव, राजेगाव, चिंचबन, सौंदाळा या 12 गावांची ’जलयुक्त शिवार 2ं साठी निवड झाली आहे

‘जलयुक्त शिवार अभियान 2’ अंतर्गत नेवासा तालुक्यातील निवडलेल्या गावांसाठी नोडल अधिकारी नेमण्यात आले असून त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी यांचेकडे फत्तेपूर, लोहरवाडी, झापवाडी, चांदा या चार गावांची जबाबदारी आहे.

मुळा पाटबंधारे घोडेगाव उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे घोडेगाव, सोनई, करजगाव व सुकळी खुर्द या गावांची तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता यांचेकडे पिचडगाव, राजेगाव, चिंचबन व सौंदाळा या गावांची जबाबदारी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या