जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
जिल्हयात गत काही महिन्यांपूर्वी कापूस उत्पादकांना कोरोना साथरोग प्रादूर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे दोन ते तीन वेळा कापूस खरेदी बंदचा फटका सहन करावा लागला होता.
त्यामुळे यावर्षी कापूस उत्पादक शेतकर्यांना कापूस विक्रीसंदर्भात अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी भारतीय कॉटन कॉर्पोरेशन सीसीआय आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाला (फेडरेशन)कापूस हंगामाच्या सुरूवातीपासूनच समन्वयाने खरेदीचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे पणन (फेडरेशन) संचालक संजय पवार यांनी ‘ दै.देशदूत’ शी बोलतांना सांगीतले.
सुमारे साडेचार लाख हेक्टरवर कपाशी वाणाची लागवड झाली असल्याचा कृषि विभागाचा अहवाल आहे. राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सन 2020-21 च्या कापूस खरेदी हंगामाच्या पूर्व तयारीचा आढावा बैठक घेण्यात आली असून यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वाधात किंवा आक्टोबर महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात कापूस खरेदीस सुरूवात होण्याची शक्यता आहे.
कापूस खरेदी संदर्भात पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत आगामी सप्ताहात बैठक आयोजीत करण्यात आली असल्याचे देखिल संचालक पवार यांनी सांगीतले.
सद्यस्थितीत जिल्हयात यंदाचा कापूस वेचणी हंगामास सुरूवात झाली असून कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ फेडरेशन कडून गेल्या हंगामापासूनच गे्रडरच्या मनुष्यबळाच्या अभाव असल्याच्या तक्रारीनुसारर प्रत्येक कापूस खरेदी केंद्रांवर किमान एक ग्रेडर असावा आणि कापूस खरेदी करण्यापूर्वी आवश्यक मनुष्यबळ कृषी विभागाने उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
या कापूस हंगामात मध्यम स्टेपल कपाशीचे एमएमसपी प्रति क्विंटल 5515 रुपये तर उत्तम दर्जाच्या कपाशीचे दर 5825 रुपये शासनाकडून निर्धारीत करण्यात आले असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आवक वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
सीसीआयच्या मानकानुसार शेतकर्यांकडून खरेदी करण्यात येणार्या कापसात 12% पेक्षा जास्त आर्द्रता नसलेलाच कापूस खरेदीस प्राधान्य असून सध्या बाजारात कापूस सामान्य दर्जाचा येत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.