साखरेचे भाव कमी होणार – जयप्रकाश दांडेगावकर

jalgaon-digital
2 Min Read

पुणे |प्रतिनिधी| Pune

यावर्षी महाराष्ट्रात ऊस लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे प्रत्येक कारखान्यात दहा टक्के इथेनॉलचे उत्पादन करुनही साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे.

गतवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे उसाची लागवड क्षेत्र वाढले आहे, त्यामुळे कारखान्यांचा गाळप हंगाम सुद्धा लांबणीवर पडणार असल्याची माहिती आहे. कारण प्रत्येक कारखान्यांना सर्व उसाचे कमीकालावधीत गाळप करणे शक्य नसल्यामुळे प्रत्येक कारखान्याचा गाळप हंगाम हा १६० दिवसापर्यंत असावा, अशी माहिती जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे.

साखरेच्या उत्पादनात यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, दरवर्षी देशाला २६५ लाख टन एवढ्या साखरेची आवश्यकता असते. पण या पेक्षाही मोठ्या प्रमाणात उत्पादन या वर्षी झाले आहे आणि गाळप हंगाम सुरू असल्यामुळे हे उत्पादन अजूनही वाढणार असल्यामुळे साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. मधील काळात हीच साखर ३३०० रुपये प्रति क्विंटल होती. आता ते भाव कमी होऊन तीन हजार १०० रुपये प्रति क्विंटल असे झाले आहेत. तर पुढील काळात हे भाव तीन हजाराच्या जवळपास असण्याची शक्यता जयप्रकाश दांडेगावकर यांनी वर्तवली आहे.

मोठ्या प्रमाणात साखरेची दरवर्षी निर्यात होत असते. या साखरेची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही घसरण्याची शक्यता सुद्धा नाकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा मोठ्या प्रमाणात भाव घसरण्याची शक्यता असल्याचे दांडेगावकर यांनी सांगितले.

शिल्लक उसाचा प्रश्न महाराष्ट्रात गंभीर बनत चालला आहे. प्रदीर्घ कालावधी होऊनही ऊसतोड होत नसल्यामुळे उसाला तुरे फुटतात आहेत. परिणामी उसाच्या वजनात घट होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उसाचा गाळप हंगाम कालावधी वाढवण्यात यावा आणि ऊस बियाणांमध्ये बदल करणे गरजेचे असल्याचे दांडेगावकर यांनी सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळले जाऊ शकते, असे ते म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *