नाशिक । प्रतिनिधी
मराठा क्रांती मोर्च्याचा पदाधिकार्यांनी आरक्षणासाठी शुक्रवारी (दि.२) वसंतस्मृती या भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ जागरण घातले. भाजप हा राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असून मराठा आरक्षण मार्गी लावण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर दबाव टाकावा अशी मागणी आंदोलकांनी करत जोरदार घोषणाबाजी केली.
मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस जटील होत असून बीड जिल्ह्यात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. यामुळे मराठा समाजात संतापाची लाट अाहे. मराठा समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आरक्षणासाठी सरकारवर दबाव टाकावा या मागणीसाठी आंदोलकांनी भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
आंदोलकांनी गोंधळ जागरण घालत लछ वेधले. मराठा समाजात संतापाची लाट आहे. राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे. राज्यातील सरकारातील तिन्ही पक्ष व विरोधी पक्ष असलेल्या भाजपने एकत्र येत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा अशी मागणी आंदोलकांनी केली.
तसेच केंद्रात भाजपचे सरकार आहे. भाजप लोकप्रतिनिधिंनी केंद्रापर्यंत हा मुद्दा पोहचवावा. केंद्र व राज्य या दोघांनी एकत्र येऊन मार्ग काढावा अशी मागणि यावेळी करण्यात आली.
आंदोलकांना नोटिसा
पोलिस प्रशासनाला माहिती देउनही त्यांनी आम्हाला नोटिसा धाडल्या असा आरोप करत राज्यशासनाच्या मुस्कटदाबिला आम्ही जुमाणनार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला. पोलिसांनी सकाळी ऐनवेळी नोटिस धाडली. मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे. तरी देखील नोटिस देउन त्रास दिला जात असेल तर यापुढे गनिमी काव्याने आंदोलने केली जातील असा इशारा आंदोलकांनी देत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.