सातपूर । प्रतिनिधी
औद्योगिक वसाहतींमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा व मलबा टाकला जात आहे.
त्यामुळे औद्योगिक क्षेत्राची दुरवस्था झाल्याचे चित्र दिसून येते. अशा प्रवृत्तींना कोण पायबंद घालणार, असा सवाल उद्योग क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.
येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या भूखंड लगतच्या मोकळ्या जागांमध्ये उद्योग तसेच निवासी भागातून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे.
यासोबतच बांधकामानंतर उरलेली माती देखील टाकले जात असल्याने औद्योगिक क्षेत्र म्हणजे डम्पिंग ग्राउंड झाली की काय असा सवाल उद्योजक उपस्थित करीत आहेत.
पडलेल्या घाणीची जबाबदारी उद्योगांवर टाकत मनपा प्रशासन थेट दंडात्मक कारवाई करीत आहे. अशा पद्धतीने बेजबाबदारपणे कचरा टाकून जाणार्या प्रवृत्तींवर कोण लक्ष ठेवणार? त्यांना दंडात्मक कारवाई कोण करणार? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.
एमआयडीसी क्षेत्रातील या जागांवर नेमके विकास काम कोण करणार आहे? मनपा प्रशासन व एमआयडीसी परस्परांकडे चेंडू टोलवत असल्याने उद्योगक्षेत्र मात्र वार्यावर सोडल्यासारखे चित्र आहे.