Thursday, April 25, 2024
Homeनगरनागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची सूचना

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची सूचना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भारतीय हवामान विभागाने नगर जिल्ह्यात 11 ते 14 जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणार्‍या गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधार्‍यातून व भिमा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. ही स्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणार्‍या नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात आजपर्यंत 166.3 मिली मीटर (37.1 टक्के) पर्जन्यमान झालेले आहे. जिल्ह्यातून वाहणार्‍या गोदावरी नदीस नाशिक जिल्ह्यातील विविध धरणाद्वारे सोडलेल्या विसर्गामुळे नांदुरमधमेश्वर बंधार्‍यातून, तसेच भिमा नदीस पुणे जिल्ह्यात झालेल्या पर्जन्यमानामुळे दौंड पूल येथे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदी पात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणार्‍या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नदी पात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. जुनाट / मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते.त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्यार्‍या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.

धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणार्‍या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवितास धोका उद्भभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्थानक यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844/ 2356940 वर संपर्क साधावा, असे आवाहनही निचित यांनी या केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या